साल साधारण 2013 असावं. अनंतचतुर्दशीचा दिवस होता. मालेगावच्या कॅम्प भागातील मोसम नदीलगतच्या गणेश कुंडावर गणेश विसर्जनासाठी गर्दी झालेली होती. दुपारची वेळ आणि अचानक हरणबारी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा लोंढा आला. मोसम खळाळून वाहू लागली. हळूहळू पाणी वाढू लागले. थोड्या वेळातच मोसमने रौद्र रूप धारण केले. नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांपैकी एका कुटुंबाकडे घोडा होता आणि तो नदीकाठालगतच पात्रात बांधलेला होता. हा घोडा सोडविण्यासाठी त्या कुटुंबातील दोघे भाऊ पाण्यात उतरले आणि घोडा सोडविण्याची खटपट करू लागले. पाण्याला प्रचंड वेग होता. दोघांनी घोड्याला मोकळं केलं पण त्याला काठावर आणणे मात्र अवघड झाले.
दोघंही घोड्याला ओढू लागले पण तेवढ्यात आलेल्या पाण्याच्या नव्या लोंढ्याने घोडाही वाहू लागला आणि दोघं भाऊही! एकच आरडाओरडा सुरू झाला, “घोडा गेला-घोडा गेला, दोघं भाऊ गेले. भाऊ गेले.’ पण भावांचं नशीब बलवत्तर, घोडा तर त्यांच्या हातातून निसटला आणि धारेला लागला. पुढे जाऊन मेलाच, पण हे दोघं भाऊ वाहता वाहता अचानक एका काटेरी झाडाला अडकले. दोघांनी झाड गच्च पकडले. एव्हाना हा सगळा प्रकार विसर्जन करणाऱ्या लोकांना कळला होता. मुलांना कसं वाचवावं हा प्रश्न होता. गणेशकुंडावर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे कर्मचारी देखरेख करीत होते. सगळ्यांनी तिकडे धाव घेतली. त्यांच्यातला एक जण म्हटला, मी जातो आणि त्याने वाहत्या पाण्यात उडी मारली. सगळं कसब पणाला लावून तो त्या दोन्ही भावांजवळ पोहोचला. भाऊ प्रचंड घाबरलेले.
दोघांनाही पाण्याबाहेर यायचे होते, पण एकावेळी एकालाच आणता येणे शक्य होते. मग हा गेलेला जवान दुसऱ्या भावाला, मी तुला घ्यायला येतो, असं सांगून एकाला ओढत ओढत पात्राबाहेर घेऊन आला, पण येईपर्यंत त्याची अवस्था अत्यंत वाईट झालेली होती. सगळं अंग खरचटलं होतं. कपडे फाटले होते. पाण्याच्या वेगाला तोंड देत देत महत्प्रयासाने तो बाहेर पडला. अतिश्रम झाल्याने प्रचंड थकवा आला होता. त्यामुळे आता दुसऱ्या भावाला काढण्यासाठी ताकदच उरली नव्हती. पण त्या पाण्यात उतरण्याची कोणाचीही तयारी नव्हती. शेवटी पुन्हा एकवार त्याने पाण्यात उडी घेतली. पाण्यात अडकलेल्या त्या दुसऱ्या भावाजवळ पोहोचला. त्याला आधार दिला आणि काठाकडे येऊ लागणार तेवढ्यात अवसान संपलं आणि दोघंही त्या वेगवान पाण्यात वाहू लागले. काठावर खूप आरडाओरडा सुरू झाला, “बुडाले-बुडाले!’ आणि दोघंही काही क्षणात दिसेनासे झाले.
सगळं वातावरण सुन्न झालं. जो तो पुढे धावू लागला, पण दोघांचा मागमूस नव्हता. हळहळ व्यक्त होऊ लागली, पण “ईश्वरेच्छा बलियेसी म्हणतात’ तेच खरं! बऱ्याच अंतरावर या पोहणाऱ्या जवानास किंचित आधार मिळाला, बस् तेवढं पुरेसं होतं. दुसऱ्या भावाला ओढत ओढत त्याने किनाऱ्यावर आणलं. बाहेर काढलं. सगळं अंग चिखलाने माखलं होतं. दोघं बाहेर पडता न पडता तोच मागचा जमाव धावत धावत येतच होता. लोकांनी जल्लोष केला आणि या अग्निशमन दलाच्या जवानाला खांद्यावर उचलून घेतलं. सर्वदूर आनंदाचे वातावरण पसरले. कोण हा धैर्यवान पोहणारा माणूस, जो जीवावर उदार होऊन पाण्यात उतरला. हा माणूस मालेगाव महापालिकेच्या अग्निशमन दलात फायरमन या पदावर काम करणारा, शकील अहमद मोहम्मद साबीर ऊर्फ शकील तैराक!
शकीलचे वडील मोहम्मद साबीर अग्निशमन दलातच कामाला होते. ते लहानग्या शकीलला बऱ्याचदा सोबत नेत असत. कुठे आग लागली, कोणी बुडालं की शकील त्यांच्यासोबत असायचा. इतर वेळेसही पोहोण्यामधील बारकावे ते शकीलला शिकवीत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून शकील पोहोण्यात तरबेज झाला. दुर्दैवाने 2003 मध्ये वडील हृदयविकाराच्या झटक्याने वारले. 2004 मध्ये अनुकंपा तत्त्वावर वडिलांच्या जागी शकील फायरमन म्हणून नोकरीस लागला. पोहण्यामध्ये कौशल्य प्राप्त केलेल्या शकीलची हळूहळू कीर्ती पसरू लागली. कितीही खोल पाण्यातल्या मृतदेहांना बाहेर काढण्याचे काम शकील करू लागला. त्यातून मग गेल्या सतरा वर्षांत केवळ नाशिक जिल्ह्यातच नाही तर नाशिक बाहेरही अनेक जिल्ह्यात शकीलला बोलावले गेले. कोणाचा मृतदेह काढण्याची वेळ येणे ही गोष्ट तशी दुर्दैवाचीच, पण त्याचवेळी पुण्याचीही! शकीलने आजवर वेगवेगळ्या ठिकाणाहून 538 मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहे तर 90 हून अधिक लोकांचे जीव वाचवले आहेत. ही गोष्ट अद्भूतच म्हणावी लागेल.
मेशी या गावाजवळ ऍपे रिक्षा आणि एस.टी. बसमध्ये झालेल्या अपघातात दोन्ही वाहनं रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विहिरीत कोसळली. या घटनेत तब्बल 26 लोक मृत्युमुखी पडले. या अपघाताच्या वेळी विहिरीत उतरून तातडीने मृतदेह काढणे गरजेचे होते. ग्रामीण पोलीस दलाच्या मुख्याधिकारी आरतीसिंग यांना मालेगाव अग्निशमन दलाचे फायर ऑफिसर संदीप पवार यांनी, शकीलविषयी सांगितले. शकीलला उतरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर शकील अविश्रांतपणे सात आठ तास काम करीत होता. तेवढ्या वेळात 16 ते 18 मृतदेह त्याने विहिरीतून बाहेर काढले.
डॉ. विनोद गोरवाडकर