नवी दिल्ली : ऑलिम्पिकमधील कामगिरीनंतर आता भारतीय खेळाडू मायदेश परतत आहेत. त्यातील तामिळनाडूमधील त्रिची येथे सुब्बा वेंकटेशन आणि धनलक्ष्मी शेखर या दोन भारतीय अॅथलेट्सचे आगमन झाले. या दोन्ही अॅथलेट्सचे त्रिचीमधील नागरिकांनी भव्य असे स्वागत केले.
धनलक्ष्मीने तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे आभारही मानले. राज्य सरकारने दिलेल्या सरकारी नोकरीमुळे माझ्या कुटुंबासमोरील आर्थिक संकटं काही प्रमाणात कमी होतील अशा भावना धनलक्ष्मीने व्यक्त केल्या. मात्र त्यांनंतर अचानक धनलक्ष्मी रस्त्यावरच खाली बसून रडू लागली. अनेकांना या मागील कारणच कळले नाही.
धनलक्ष्मीच्या बहिणीचे नुकतच निधन झाले. बहिणीचं निधन झालं तेव्हा धनलक्ष्मी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी घरापासून दूर तयारीसाठी गेली होती. मात्र घरच्यांनी तिला बहिणीच्या निधनासंदर्भात माहिती न देण्याचा निर्णय घेतला. धनलक्ष्मीला तिच्या खेळावर लक्ष केंद्रीत करता यावं आणि तिने पूर्णपणे स्वत:ला स्पर्धेत झोकून देत चांगली कामगिरी करावी या उद्देशाने तिच्या आईने बहिणीच्या मृत्यूबद्दल तिला भारतात परत येईपर्यंत न सांगण्याचा निर्णय घेतला होता.
धनलक्ष्मीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधून झाल्यानंतर तिला विमानतळावरच तिच्या एका नातेवाईकाने तिच्या मोठ्या बहिणीचे महिन्याभरापूर्वी निधन झाल्याची माहिती दिली. त्यावेळ धनलक्ष्मी ही पतियालामध्ये ऑलिम्पिकसाठी प्रशिक्षण घेत होती. धनलक्ष्मीची थोरली बहिणी गायत्रीचं १२ जुलै रोजी निधन झालं. मात्र धनलक्ष्मीच्या आईने आपल्या मुलीला तिच्या मोठ्या बहिणीच्या निधनाबद्दल न कळवण्याचा निर्णय घेतला.
धनलक्ष्मी २३ जुलै रोजी टोक्योसाठी रवाना होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला. ही बातमी समजल्यानंतर रस्त्यावरच गुडघ्यावर बसून रडणाऱ्या धनलक्ष्मीला तिच्या आईनेच हाताला पकडून उठवत आधार देण्याचा प्रयत्न केल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पहायाला मिळत आहे.
तामिळनाडूमधील ज्या मोजक्या तरुण खेळाडूंकडे भविष्यामधील चांगल्या कामगिरीसाठी पाहिलं जातं त्यामध्ये धनलक्ष्मीचा समावेश आहे. त्यामुळेच धनलक्ष्मीने ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणं आणि चांगली कामगिरी करणं हे अधिक महत्वाचे असल्याने तिची आई उषा आणि घरच्यांनी तिला भारतात परत येईपर्यंत बहिणीच्या मृत्यूची खबर लागू दिली नाही.
धनलक्ष्मी ही फार गरीब घरातील असून वयाच्या १५ व्या वर्षीच तिचे पित्रृछत्र हरपले. त्यानंतर याच वर्षी मार्च महिन्यात पतियालामध्ये धनलक्ष्मीने भारताची १०० मीटर ट्रॅकची क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुत्ती चंदला तिने पराभूत केले आणि ती प्रकाशझोतात आली.