- कासारवाडी परिसरात डासांची उत्पत्ती वाढली
- मैलामिश्रीत पाणी, कचऱ्यामुळे घाणीचे साम्राज्य
पिंपळे गुरव – आपला परिसर स्वच्छ ठेवा हा सर्वदूर संदेश आपणाला स्थानिक प्रशासनाकडून नेहमी दिला जातो. खरंतर नदीला देवता, माता संबोधले जाते. आता एकीकडे स्वच्छ भारत अभियानाचा डंका पिटला जातो, तर दुसरीकडे स्मार्ट सिटी अंतर्गत कामांचा धडका थांबत नाही, त्यामुळे वाढत्या अस्वच्छतेमुळे शहरांच्या सौंदर्यास आणि आरोग्यास बाधा निर्माण होत आहे. कासारवाडी परिसरात पवना नदीपात्रातील वाढती जलपर्णी आणि पात्रातील दूषित पाण्यामुळे डासांची उत्पत्ती दिवसेंदिवस वाढली. वाढत्या डासांमुळे नदीकाठच्या रहिवाशांना डंख आरोग्याला धोका निर्माण करीत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील कासारवाडी येथील पवना नदीत रसायनयुक्त सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे येथील पवना नदी फेसाळली आहे. मध्यभागी नदी पात्रात साबणाच्या पाण्यासारखा फेस तरंगत आहे. अनेकदा येथे शिमला-काश्मीरसारखे दृश्य पाहायला मिळत आहे. गेली अनेक महिने या नदीतून पांढरा फेस येत आहे. नदीतील पाणी हिरवेगार झाले आहे, त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. पालिकेतील अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे. या नदीत छोट्या-मोठ्या उद्योग धंद्यामुळे रसायन मिश्रित दूषित पाणी सोडले जाते. येथील नाल्याचे पाणी थेट नदीमध्ये मिसळले जाते. या परिसरात कोणतीही औद्योगिक वसाहत नसून, या भागामध्ये रहिवासी सोसायट्यांची संख्या अधिक प्रमाणात आहे.
येथील सांडपाणी नदीमध्ये मिसळत आहे. महापालिकेने नाल्यामधून थेट नदीत जाणारे सांडपाणी हे प्रक्रिया प्रकल्पाकडे वळवावे, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.
या ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी येथील नदीतील पाण्याचे नमुने घेऊन प्रयोग शाळेतून तपासणी करण्यात यावी. पाणी दूषित आहे का नाही याचा अहवाल सादर करण्यात यावा. तसेच नदीच्या दोन्ही बाजूच्या वेगवेगळ्या प्रकारची वनस्पतींची गर्दी झाली आहे. त्यामुळे संपूर्ण कासारवाडी परिसरात डासांची उत्पत्ती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या आरोग्यास दिवसेंदिवस धोका निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला.
काही वर्षांपूर्वी या नदीत नागरिक आंघोळ करण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, गुरे-ढोरे पाणी पिण्यासाठी येत असत. आता ते देखील येणे बंद झाले आहे. कारण नदीतील पाणी दूषित झाले आहे. पाणी हिरवेगार पडले आहे. पालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्वरित ते पाणी सोडण्याचे थांबवावे. तसेच संपूर्ण कासारवाडीमधील सांडपाणी ज्यापद्धतीने सोडण्यात आले आहे. ते देखील त्वरित थांबवून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाकडे वळवावे. महापालिकेने त्यासंदर्भात उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. महापालिकेने याकडे दुर्लक्ष न करता वेळीच कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांकडून यावेळी करण्यात आली.
जलपर्णीचे साम्राज्य वाढता वाढे
पवना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जाते, त्यामुळे प्रदूषणात वाढ होते. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने थेरगाव, केजूबाई बंधारा परिसरातील नदीपात्राचा सर्व्हे केला. त्यावेळी वाकड, थेरगाव परिसरातील सोसायट्यांमधील सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याचे दिसून आले. सांडपाण्यामुळे जलपर्णीमध्ये वाढ होत असल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात आला होता. मात्र तरीही महापालिका प्रशासनाकडून सांडपाणी नदी पात्रात सोडण्याबाबत कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही, त्यामुळे नदीपात्रातील जलपर्णी वाढता वाढत असल्याची बाब समोर आली आहे.
पवना नदी प्रदूषणात गेल्या अनेक वर्षांपासून वाढ होत आहे. जलपर्णी येण्याआधीच का काढली जात नाही. नदीपात्रात जलपर्णी पसरल्यानंतर नागरिकांना डास, मच्छरांचा त्रास सहन करावा लागतो. याकडे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. नदी प्रदूषणाबाबत आम्ही वारंवार पाठपुरावा करतो. ठेकेदाराच्या चुकारपणामुळे नदीचे प्रदूषण वाढते. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी. याशिवाय नदीपात्रात रसायन मिश्रीत पाणी सोडण्यात येते. त्यामुळे जलप्रदूषणात आणखी भर पडते. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे.
– राजू सावळे, उपशहराध्यक्ष, मनसे, पिंपरी-चिंचवड शहर