- शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी विविध पक्ष, कामगार संघटना एकवटल्या
पिंपरी – दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. विविध पक्ष तसेच कामगार संघटना संयुक्त कृती समिती, पुणे आणि जन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने शनिवारी (6 ) दुपारी बारा वाजता पुणे नाशिक महामार्गावर मोशी चौकात हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार विलास लांडे, ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल, नगरसेवक अजित गव्हाणे, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा नगरसेविका वैशाली काळभोर, मानव कांबळे, अरुण बोऱ्हाडे, धनंजय आल्हाट, अतुल शितोळे, संजय वाबळे, काळूराम पवार, माजी नगरसेवक मारुती भापकर, माजी नगरसेविका शमीम पठाण, मंदा आल्हाट, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, विशाल काळभोर, कामगार नेते मनोहर गडेकर, दिलीप पवार, वसंत पवार, अनिल रोहम, इरफान सय्यद, किशोर ढोकळे, विजय लोखंडे, मयूर जयस्वाल, गणेश दराडे, नीरज कडू, संदीप जाधव, गंगा धेंडे, उत्तम आल्हाट, मोहन आडसूळ, धनाजी येळकर पाटील, सतिश काळे आदींसह शेतकरी व कामगार या आंदोलनात सहभाग घेतला.
यावेळी विलास लांडे म्हणाले की, केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील फायद्यातील कंपन्या विकायचे काम सुरु केले आहे. त्यामुळे बीएसएनएल प्रमाणेच इतरही फायद्यातील सार्वजनिक कंपन्या भांडवलदारांच्या हातात जातील. त्यामुळे लाखो कामगारांचा रोजगार जाऊन कुटुंब उद्धवस्त होतील. या बाबत जनतेने सरकारला जाब विचारला पाहिजे. पुन्हा जर भाजपा सरकार सत्तेवर आले तर ते देश विकायला काढतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
या आंदोलनात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनामुळे पुणे नाशिक महामार्गावर तसेच देहू आळंदी बीआरटी मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.