मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेत मध्यान्ह भोजन योजनेत सुमारे 20 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने प्रशासनावर या भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यासाठी केडीएमसीने मे 2019 मध्ये संस्थांकडून निविदा मागवल्या होत्या. या प्रक्रियेत सहभागी झालेल्या 23 पैकी 13 संस्थांना मध्यान्ह भोजन पुरवण्याचे काम देण्यात आले.
मात्र, नियमानुसार हे काम स्थानिक महिला बचतगट किंवा संस्थांना देणे अपेक्षित असताना अक्षय पात्रा नावाच्या बाहेरील संस्थेला हे काम देण्यात आले. हे काम देताना सर्व नियम डावलण्यात आल्याचा आरोप केडीएमसीतील सभागृह नेते, शिवसेना नगरसेवक श्रेयस समेळ यांनी केला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या संस्थेला काम देताना केडीएमसीने जो ठराव केला, त्यावर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार या संस्थेला काम देण्यात येत असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून हा ठेका देण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
त्यामुळे या सगळ्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आता हा ठेका रद्द करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या ऍडव्होकेट सुवर्णा पावशे यांनी केली आहे.