मोरबी – गुजरातमधील मोरबी पूल कोसळल्याप्रकरणी आरोपी असलेले ओरेवा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) जयसुख पटेल यांनी मंगळवारी मोरबी येथील सीजेएम न्यायालयात आत्मसमर्पण केले. यापूर्वी सीजेएम कोर्टाने जयसुख पटेलविरोधात वॉरंट जारी केले होते. यापूर्वी अटक टाळण्यासाठी जयसुख पटेल यांनी मोरबीच्या सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.
गेल्या वर्षी 30 ऑक्टोबर रोजी मोरबी येथील मच्छू नदीवरील पूल कोसळून 135 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर गुजरात पोलिसांनी नऊ जणांना अटक केली होती. ज्यामध्ये ओरेवा ग्रुपचे चार कर्मचारी सहभागी होते. त्यामध्ये कंपनीचे दोन व्यवस्थापक आणि दोन तिकीट क्लर्क आहेत.
तक्रारीमध्ये जयसुख पटेलचेही नाव आरोपी म्हणून नोंदवण्यात आले आहे. जयसुख पटेल यांनी 20 जानेवारी रोजी मोरबीच्या सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता, परंतु न्यायालयाने तो फेटाळला होता. गुजरात पोलिसांनी 27 जानेवारी रोजीच मोरबी सस्पेंशन ब्रिज दुर्घटनेप्रकरणी 1,262 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. आरोपपत्रात ओरेवा ग्रुपच्या जयसुख पटेलच्या नावाचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे.
गुजरात हायकोर्टही या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत आहे. उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात अजिंता मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड (ओरेवा ग्रुप) या कंपनीला नोटीस बजावली होती, जी मोरबी सस्पेंशन ब्रिजची देखभाल आणि संचालन करते. या कारवाईत कंपनीला प्रतिवादी बनवण्याची मागणी करण्यात आली होती. अपघातामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कंपनीला करावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती.
पुलाच्या दुरुस्तीसाठी अजिंठा कंपनीने देवप्रकाश सोल्युशन्सशी करार केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. सरकारला न कळवता किंवा फिटनेस सर्टिफिकेट न घेता दिवाळीच्या सुटीत हा पूल जनतेसाठी खुला करण्यात आला होता.