दक्षिण गंगेचे पावित्र्य जपण्यासाठी चंद्रकिशोर पाटील यांच्या कार्याचे कौतुक
नाशिक – जलप्रदूषण ही समस्या देशभरात पसरलेली असताना एक जलरक्षक मात्र, आपल्या कार्याने त्यावर नियंत्रण राखण्यासाठी खारीचा वाटा उचलत आहे. चंद्रकिशोर पाटील असे या जलरक्षकाचे नाव आहे. नाशिकच्या गोदातिरावर सूर्याचा उदय होण्यापूर्वीच चंद्रोदय होतो. हाच चंद्रकिशोर सध्या सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या पोस्टमुळे कौतुकाचा विषय बनला आहे.
गंगा प्रदूषण दूर करण्यासाठी जसे हजारो हात एकवटले त्यापेक्षा चंद्रकिशोर यांच्या पुढाकाराने एक व्यक्ती बदल घडवू शकतो हे देखील सिद्ध झाले. त्यांच्या कार्याला आयएफएस अधिकारी असलेल्या स्विता बोड्डू यांनी उजेडात आणले. सध्या ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत असून चंद्रकिशोर यांना हजारोंच्या संख्येने लाईक्स मिळत आहेत.
गोदातीरावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत उभे राहून नदीत निर्माल्य टाकणाऱ्यांना शिट्टी वाजवून जागे करतात व जलप्रदूषण करण्यापासून रोखतात. संपूर्ण दिवस हाच उपक्रम करुनही ते थकत नाहीत. निर्माल्य किंवा कचरा टाकण्यासाठी आलेल्या लोकांकडून प्लॅस्टिकच्या पिशव्या तसेच निर्माल्य स्वतःच्या ताब्यात घेतात व त्याची विल्हेवाटही लावतात. हे सर्व कार्य ते अत्यंत निस्वार्थी हेतूने करत आहेत.
गोदाकाठाजवळच्या इंदिरानगरमध्ये राहात असलेले चंद्रकिशोर म्हणतात, मी सकाळपासून रात्रीपर्यंत गोदाकाठावर उभा राहतो व कचरा तसेच निर्माल्य टाकण्यापासून नागरिकांना रोखतो. काहीवेळा नागरिक माझ्या सूचनेचा आदर करतात. तर काही अत्यंत उद्धटपणे वादही घालतात. तरीही मी त्यांच्याशी वाद न वाढविता माझे काम अव्याहतपणे करतो. ही एक सामाजिक बांधिलकी समजून मी हे काम करतो.
गोदावरीत निर्माल्य टाकण्यापासून रोखत जलप्रदूषण व अस्वच्छता रोखण्यासाठी अनेक नागरिकांना मार्गदर्शनही चंद्रकिशोर करतात. त्यामुळे रोगराई व आरोग्याचे प्रश्नही किमान स्तरावर सोडवले जातात. दिवसभर उभे राहून गोळा केलेला कचरा तसेच निर्माल्य ते स्वतः नाशिक महापालिकेकडे जमा करतात. हे कार्य ते गेले पाच वर्षे करत आहेत. नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती व्हावी हा प्रामाणिक हेतू चंद्रकिशोर सातत्याने जपत आहेत. हे कार्य यापुढेही सुरुच राहणार आहे, असा निर्धारही ते व्यक्त करतात.
महापालिकाही पुढाकार घेणार का
चंद्रकिशोर यांनी सुरु केलेल्या या जनजागृतीची दखल घेत नाशिक महापालिकाही जलप्रदुषण रोखण्यासाठी पुढाकार घेणार का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. नाशिकमधील गोदाकाठांचे सुशोभीकरण करण्याची मोहिम काही वर्षांपूर्वी सुरु झाली होती, त्याचाच एक भाग म्हणून आता नद्या, तलाव अशा ठिकाणी जलप्रदुषणाबाबत जनजागृती करणे सुरु झाले तरच खरी क्रांती घडेल. मात्र, त्यासाठी चंद्रकिशोर यांच्यासारख्या जलरक्षकांना सर्व स्तरांवरुन पाठिंबा मिळायला हवा.