नवी दिल्ली – संसदेचे पावसाळी अधिवेशन उद्या, सोमवारपासून सुरू होत आहे. महागाई, बेरोजगारी, वाढत्या गॅसच्या किंमती यासारख्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी व्यूहरचना आखली आहे तर विरोधकांचा डाव हाणून पाडण्यासाठी सरकार सुध्दा कंबर कसून तयार आहे.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत जवळपास सर्वच पक्षाचे नेते सहभागी झाले. अशात उद्यापासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन गाजण्याची चिन्हे आहेत. या अधिवेशनादरम्यान राष्ट्रपती उपराष्ट्रपती पदांसाठी निवडणूक होणार असून निवडून आलेल्यांना पदभार घ्यायचा आहे. विरोधकांच्या कमानीत बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि लष्करात सैनिक भरतीची नवी योजना अग्निपथ, महागाई, रुपयाची घसरण असे अनेक मुद्दे आहेत. सरकारला घेरण्यासाठी विरोधक तयार आहेत.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांना देशहिताच्या ज्वलंत मुद्द्यांवर अर्थपूर्ण चर्चा करून सभागृहाचे कामकाज सुरळीत चालविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. बैठकीत सर्व पक्षांच्या नेत्यांना कोविडच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचे आयोजन आणि तयारी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही अधिवेशनासंदर्भात आपल्या सूचना आणि मते मांडली आणि महागाई, बेरोजगारी, देशासमोरील आव्हाने या विषयांवर चर्चा करण्याची मागणी केली.
लोकसभेतील कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी पत्रकारांना सांगितले की, कॉंग्रेसने बेरोजगारी, शेतकऱ्यांचा प्रश्न आणि अग्निपथ, सैन्यात सैनिकांची भरती करण्याची नवीन योजना यासह इतर विषयांवर चर्चा करण्याची मागणी केली आहे. वाढती महागाई, रुपयाची घसरण आणि इतर मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी चर्चेची मागणी केली आहे.