नवी दिल्ली – ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पाचशे रूपये देखील नाहीत अशा तामिळनाडुतील दोन गरीब दलित शेतकऱ्यांवर ईडीने चक्क मनिलॉंड्रिंगची कारवाई केली आहे. भाजपच्या स्थानिक नेत्याशी या शेतकऱ्यांचा जमीनीचा वाद आहे. त्यातून त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठीही ईडीचा वापर केला गेला असल्याचे हे आगळेच उदाहरण ठरले आहे.
या कारवाईच्या विरोधात हे शेतकरीही ठाम आहेत व दबून न जाता त्यांनी लढण्याचा बाणा कायम ठेवला आहे. तामिळनाडुच्या अत्तुर मधील रामनायकेनपलयन परिसरातील एस कन्नियन (वय ७२) आणि त्यांचे बंधु एस कृष्णन (वय ६५) अशी या कारवाई झालेल्या दोघांची नावे आहेत. त्यांचा भाजपचे स्थानिक पदाधिकारी जी गुणसेकर यांच्याशी जमीनीचा वाद आहे.
या दोन बंधुंची सुमारे साडे सहा एकर जमीन आहे. ही जमीन काही धनाढ्य लोकांना बळकवायची आहे. त्यातून त्यांच्यावर ईडीची ही कारवाई झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन बंधुंच्या बँक खात्यावर केवळ साडे चारशे रूपये इतकी रक्कम आहे. परंतु तरीही त्यांना थेट ईडीने मनिलॉंड्रिंग कायद्या अंतर्गत नोटीस पाठवून कारवाई सुरू केली आहे.
या प्रकरणात राज्य सरकारने हस्तक्षेप करून आपल्यला न्याय द्यावा अशी त्यांची मागणी आहे. या भागात काही धनाढ्य लोेकांची सहाशे एकर जमीन आहे. त्यांच्या जमिनीसाठी ही साडे सहा एकर जमीन अडचणीची ठरत असल्याने ती जमीन विकत घेण्याचा किंवा बळकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु त्याला या शेतकरी बंधुंनी दाद न दिल्याने हा सारा प्रकार सुरू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान गुणसेकर यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. त्यांचे म्हणणे असे आहे की आपला त्या शेतकऱ्यांशी जमीनीचा वाद आहे व ते प्रकरण कोर्टात आहे. याच्याशी माझ्या पक्षाचा काहीही संबंध नाही. त्यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली आहे किंवा कसे याची आपल्याला कल्पना नाही असेही त्यांचे म्हणणे आहे.