कोलकता – पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांची आघाडी (इंडिया) बाजी मारेल, असा विश्वास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी सोमवारी व्यक्त केला. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचे लाल किल्ल्यावरील भाषण अखेरचे ठरेल, असे भाकीतही त्यांनी केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त उद्या (मंगळवार) मोदी सलग दहाव्या वर्षी पंतप्रधान म्हणून देशाला उद्देशून भाषण करतील. त्यांच्या भाषणाच्या पूर्वसंध्येला तृणमूलने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ममता बोलत होत्या.
आगामी लोकसभा निवडणुकीत इंडिया देशभरात भाजपला नेस्तनाबूत करेल. तृणमूल बंगालमध्ये भाजपला निर्णायक मात देईल. बंगालला खुर्ची नकोय.
पण, केंद्रातील भाजपचे सरकार घालवायचे आहे, असे त्या म्हणाल्या. त्यातून त्यांनी स्वत:ला पंतप्रधानपदाची आकांक्षा नसल्याचे सूचित केले. बंगालमध्ये भ्रष्टाचाराची काही प्रकरणे पुढे आली. त्याविरोधात आमच्या सरकारने तातडीने पाऊले उचलली.
त्याउलट, केंद्र सरकारच्या विरोधात भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत, असे म्हणत ममतांनी राफेल विमान करार आणि नोटाबंदीची उदाहरणे दिली.
देशभरात भाजपविरोधात ताकदीने लढण्यासाठी विरोधी पक्षांनी इंडिया ही आघाडी स्थापन केली आहे. तृणमूल पक्ष त्या आघाडीत सहभागी झाला आहे.