नवी दिल्ली – नायजेरियातील कंदुला प्रांतातील कुरिगा गावातल्या शाळेतील तब्बल ३०० विद्यार्थ्यांचे कट्टरवाद्यांनी अपहरण केले आहे. ही सर्व मुले ७ ते १८ वर्षे वयाची आहेत. सशस्त्र बंडखोरांनी शाळेवर छापा घालून या मुलांना पळवून नेले असल्याचे या मुलांच्या पालकांनी सांगितले. मुलांच्या अपहरणाची ही घटना दोन दिवसांनंतर वृत्तसंस्थांनी उघडकीस आणली. या घटनेमुळे नायजेरियातील सुरक्षेची स्थिती किती दयनीय झाली आहे, हे उघड होते.
उत्तर नायजेरियात गेल्या आठवड्यापासून सामूहिक अपहरणाची ही तिसरी घटना घडली आहे. यापूर्वी शनिवारी पहाटेच्या सुमारास इशान्येकडील साकोतो प्रांतातील एका शाळेतून १५ विद्यार्थ्यांचे अशाच प्रकारे अपहरण करण्यात आले होते. तर काही दिवसांपूर्वी वायव्येकडील बोरोनो प्रांतातून २०० लोकांचे देखील असेच अपहरण करण्यात आले होते.
सुमारे दशकभरापूर्वी बोरोनो प्रांतातील चिबोक गावातील शाळेतून अशाच प्रकारे २०० विद्यार्थिनींचे सामूहिक अपहरण केले गेले होते. ती घटना संपूर्ण नायजेरियामध्ये गाजली होती. पूर्वी किंवा आता घडलेल्या कोणत्याच अपहरणाची जबाबदारी कोणत्याच संघटनेने स्वीकारलेली नाही. मा६ देशाच्या इशान्येकडील भागात घातपाती कारवाया करणार् या इस्लामिक स्टेटशी संबंधित गटांवर या अपहरणाचा संशय व्यक्त केला जातो आहे. तर स्थानिक लोक या अपहरणासाठी काही मेंढपाळांच्या टोळ्यांना जबाबदार धरत आहेत.
गुरुवारी अपहरण झालेल्याविद्यार्थ्यांमध्ये १०० मुले १२ वर्षांखालील होती. हे सगळे जण इयत्ता दुसरी किंवा चौथीच्या वर्गात शिकत होती. त्यावेळी मोटर सायकलींवरून आलेल्या बंदुकधार् यांनी घोषणाबाजी करत या मुलांना आपल्या बरोबर पळवून नेले असे शाळेतील शिक्षिकांनी सांगितले. मुलांना मारहाण करत आणि हवेत गोळीबार करत धमकावून आपल्या बरोबर नेण्यात आले, असे या शिक्षिकेने सांगितले.
नाजयेरियाच्या पोलिसांनी जवळच्या जंगलांमध्ये मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. २०१४ पासून अशाप्रकारे १,४०० विद्यार्थ्यांचे अपहरण झाले आहे. त्यापैकी १०० मुली अजूनही अपहरणकर्त्यांच्या ताब्यात आहेत.