कोलकाता – औद्योगिक विकासासह अन्य विकासाच्या निर्देशांकात पश्चिम बंगालने देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत अत्यंत चांगली कामगीरी नोंदवली आहे. पण तरीही पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी बंगालविषयी खोटी माहिती देऊन बंगालची बदनामी केली आहे त्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी केली आहे.
मित्रा यांनी आज केंद्र सरकारच्याच सांख्यकि विभागाने जारी केलेल्या आकडेवारीची माहिती सादर केली. त्यात जीडीपी, कृषी विकास, औद्योगिक विकास, सेवा क्षेत्र आणि अन्य क्षेत्रात पश्चिम बंगाल अन्य राज्यांपेक्षा अधिक सरस स्थितीत आहे असे स्पष्ट दिसून येते आहे. ममतांच्या राज्यात बंगालचा विकास खंडीत झाला असा दावा भाजप नेत्यांकडून सतत केला जात आहे.
खुद्द पंतप्रधानच बंगाल बाबत खोटी माहिती देऊन बंगालची बदनामी करीत आहेत. त्यांना त्यांच्या सरकारच्याच सांख्यकि विभागातर्फे जारी करण्यात आलेली आकडेवारी माहिती नाही. या आकडेवारीवरून त्यांच्या वक्तव्यातील खोटेपणा रंगेहाथ पकडला गेला आहे असे ते म्हणाले.
त्यामुळे आता त्यांनी बंगाली नागरीकांची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली. त्यांनी म्हटले आहे की 31 ऑगस्ट 2020 मध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार देशाचा जीडीपी 4.18 इतका होंता त्यावेळी पश्चिम बंगालचा जीडीपी 7.26 इतका होता.
देशाचा औद्योगिक विकास 0.92 टक्के इतका असताना बंगालाचे औद्योगिक विकास मात्र 5.79 टक्के इतका नोंदवला गेला आहे असेही मित्रा यांनी नमूद केले. या खेरीज मित्रा यांनी अन्यही आकडेवारी देऊन मोदी, शहांचे दावे खोडून काढले आहेत.