नवी दिल्ली – इंडिया या विरोधकांच्या आघाडीतच अविश्वासाची स्थिती आहे. त्यामुळे एकमेकांबद्दलच्या विश्वासाची चाचणी घेण्यासाठी विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला, अशी शाब्दिक टोलेबाजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली.
बंद दाराआड झालेल्या भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत खासदारांना उद्देशून मोदी बोलत होते. दिल्ली सेवा विधेयकावर सोमवारी राज्यसभेत मतदान झाले. त्या मतदानाचे वर्णन विरोधकांनी लोकसभा निवडणुकीआधीची सेमी फायनल अशा शब्दांत केले होते. त्यामुळे विधेयक मार्गी लागल्याने सरकारने सेमी फायनल जिंकली असल्याचे मोदींनी म्हटल्याची माहिती सुत्रांनी दिली.
लोकसभेत सरकारकडे बहुमतापेक्षा अधिक संख्याबळ आहे. त्यामुळे विरोधकांनी आणलेला अविश्वास ठराव फेटाळला जाण्याची बाब काळ्या दगडावरची रेघ मानली जात आहे. त्याचा संदर्भ देऊन मोदींनी आता लास्ट बॉलवर सिक्सर मारा असे म्हणत भाजपच्या खासदारांचा उत्साह वाढवला.
सरकारकडे मजबूत बहुमत असल्याची पूर्ण जाणीव विरोधकांना आहे. तरीही केवळ त्यांच्यात एकजूट आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी त्यांनी अविश्वास ठराव आणला, अशी खिल्ली मोदींनी उडवली. तसेच, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला सलग तिसरा कार्यकाळ मिळण्याविषयीही विश्वास व्यक्त केला.