नवी दिल्ली – राज्यसभेतील 12 खासदारांच्या निलंबनाचा निषेध करण्यासाठी विरोधकांनी मंगळवारी संसद भवनापासून विजय चौकापर्यंत मोर्चा काढला. त्यामध्ये सहभागी होत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.
मोर्चा काढत विरोधकांनी निलंबन मागे घेण्याची मागणी केली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना राहुल यांनी विरोधकांची भूमिका मांडली. सरकार संसदेत विरोधकांना बोलू देत नाही. ती कृती म्हणजे लोकशाहीची हत्या आहे.
आता संसद केवळ इमारत आणि संग्रहालय बनली आहे. मोदीही संसदेत येत नाहीत. लोकशाही चालवण्याची ती पद्धत नव्हे, असे ते म्हणाले. संसदेच्या मागील अधिवेशनावेळी ऑगस्टमध्ये राज्यसभेत गोंधळ झाला होता.
त्याबद्दल विरोधी पक्षांच्या 12 खासदारांना सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातून निलंबित करण्यात आले. ते निलंबन लोकशाही तत्वांशी विसंगत आणि राज्यसभेशी संबंधित नियमांचा भंग करणारे असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. त्यावरून विरोधकांनी स्वीकारलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे राज्यसभेचे कामकाज विस्कळीत होत आहे.