नवी दिल्ली : मोदी सरकार तरूणांमध्ये हिंसाचार घडवत आहे,अशी टीका सोनीया गांधी यांनी सोमवारी केली. या हिंसाचाराची न्यायलयीन चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जवाहरललाल नेहरू विद्यापीठात रविवारी घडलेल्या हिंसाचाराबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. मोदी सरकारवर टीका करताना त्या म्हणाल्या, भारताचा आवाज तरूण आहेत आणि विद्यार्थी गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. गुंडाकरवी भीतीदायक आणि अभूतपूर्व असा हिंसाचार घडवून विद्यार्थ्यांना भयभीत करण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याची मोदी सरकारची कृती अस्वीकारार्ह आहे.
देशातील प्रत्येक विद्यापीठ आणि कॉलेजच्या आवारात एक तर पोलिस अथवा भारतीय जनता पक्ष सरकारच्या गुंडांच्या टोळ्या धाड टाकत आहेत. जेएनयुमधील विद्यार्थी आणि शिक्षकांवरील काल घडवलेला प्राणघातक हल्ला हा विरोधात जाणारा प्रत्येक आवाज दाबला जाईल, हा संदेश देणारा आहे, असे त्या म्हणाल्या.
मोदी सरकार विद्यार्थ्यांवर दडपशाही करत आहे. विद्यार्थी आणि तरूणांना परवडणारे शिक्षण हवे आहे. त्यांना नोकऱ्या हव्या आहेत. त्यांना आशादायी भविष्य हवे आहे. दुर्देवाने मोदी सरकार हे त्याच्या आशा आकांक्षावर पाणी फेरत आहे. त्यांची घुसमट करत आहे, असे त्यांनी सांगितले.
देशातील तरूण आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी कॉंग्रेस पक्ष आहे. जेएनयुमधील हिंसाचाराचा आम्ही निषेध करत आहोत. याची निष्पक्ष न्यायलयीन चौकशी करण्यात यावी, असे त्या म्हणाल्या.