मुंबई, -राष्ट्रवादी कॉंग्रेसने बुधवारी शेतकरी आंदोलकांशी चर्चेची तयारी दाखवत नसल्याबद्दल मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. शेतकरी थकतील आणि आंदोनलावरून माघार घेतील असा सरकारचा समज दिसतो, असे राष्ट्रवादीने म्हटले.
केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर शेतकरी करत असलेल्या आंदोलनाला सहा महिन्यांचा कालावधी झाला. त्यानिमित्त शेतकऱ्यांनी बुधवारी काळा दिवस पाळला. त्याला पाठिंबा दर्शवणाऱ्या 14 राजकीय पक्षांमध्ये राष्ट्रवादीचाही समावेश होता.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी निवेदन जारी करून पक्षाची भूमिका मांडली. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करणे हे मोदी सरकारचे कर्तव्य आहे, असे त्यांनी म्हटले. केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. त्यासाठी ते मागील वर्षाच्या 26 नोव्हेंबरपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत.