औरंगाबाद – मराठा समाजाला वेठीस धरु नका. मराठा आरक्षण मिळवून देणे ही माझ्यासहित खासदार, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांची जबाबदारी आहे. राज्यकर्त्यांनी भूमिका मांडणे गरजेचे असून तुम्ही समाजासाठी काय करु शकता हे सरकारने आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी राजकारण सोडून सांगावे, असे आवाहन भाजपा खासदार संभाजीराजे यांनी केले आहे.
औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणावरुन आक्रमक भूमिका मांडत सरकारने काहीच न केल्यास रस्त्यावर उतरु, असा इशारा दिला आहे.
भाजपाने आंदोलनाला पाठिंब्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, मी काही कोणाला सुचवत नाही. मी समाजाचा घटक असून बाजू मांडत असतो. ते काय मांडतात तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांची भूमिका त्यांना विचारा. समाजाची बाजू प्रामाणिकपणे सरकार दरबारी मांडायची ही माझी भूमिका आहे. 2007 पासून मी हे करत असून त्यासाठी मला कोणी आव्हान देऊ शकत नाही. ते काय मांडतात तो त्यांचा दृष्टीकोन आहे.
सरकारी दरबारी विषय पोहोचवायचा असेल तर रस्त्यावर आंदोलन करावे लागतात. 58 मोर्चे काढून हा विषय पोहचवला आहे, सरकारला सर्व गोष्टी माहिती आहे. हे काही खुळं सरकार नाही ना, म्हणूनच ते सरकार झाले आहे. पुन्हा एकदा लोकांना वेठीस धरणं या मताचा मी नाही.
मी शिव शाहूंचा वंशज असून सामान्यांची काळजी करणं कर्तव्य आहे. करोना संकट असल्याने लोकांचा जीव धोक्यात घालू शकत नाही. आंदोलन करावं की नाही हा नंतरचा प्रश्न आहे. सरकार कोणतीही दखल घेत नसेल तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करावंच लागेल, असा इशारा संभाजीराजेंनी दिला.