मोदी-फडणवीस आम्ही केलेल्या कामांची उद्घाटने करत डंका पिटतात
मुंबई: देशात मोदी आणि राज्यात फडणवीस आम्ही केलेल्या कामांची उद्घाटने करत विकासकामांचा डंका पिटत असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
निवडणुका जवळ आल्यावर केंद्र व राज्य सरकार मोठमोठया जाहिराती आणि विकासकामांची उद्घाटने करत आहे आणि विकास आम्हीच करत आहे असे सांगत आहे याचा जोरदार समाचार नवाब मलिक यांनी घेतला.
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी महाराष्ट्रात सर्वाधिक विकासकामे केली जात असल्याचा दावा केला आहे. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
पियुष गोयल हे मुंबईचे आहेत. पावसामध्ये रेल्वेची काय हालत झाली होती याचा अनुभव मुंबईकरांनी घेतला आहे. पियुष गोयल महाराष्ट्रात ४० टक्के विकास होत असल्याचे बोलत आहेत. परंतु ट्वीटर, सोशल मिडिया यावरुन सरकार किंवा व्यवस्था चालवली जात नाही हे लक्षात घ्या असेही नवाब मलिक म्हणाले.
एकही नवीन योजना या सरकारची नाही. आमच्या सरकारने सुरु केलेल्या आणि अपुर्ण राहिलेल्या कामांच्या फित कापत आहेत आणि आमच्या कामांचे श्रेय घेतले जात आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.