‘का’ मागे घेण्याची मागणी
जयपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अविचाराने नागरिकत्व दुरूस्ती कायदा (का) आणला. त्यातून त्यांनी देशाला गोंधळ आणि अशांततेच्या खाईत लोटले, असे टीकास्त्र राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी सोडले.
‘का’ आणि प्रस्तावित राष्ट्रीय नागरिक नोंदणीपुस्तकावरून (एनआरसी) गेहलोत यांनी पुन्हा मोदी, शहा आणि केंद्र सरकारला लक्ष्य केले. मोदी सरकार प्रत्येक आघाडीवर सपशेल अपयशी ठरले आहे. त्यातून खऱ्या समस्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी वेगळे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. जातीय सलोखा बिघडवला जात आहे. का आणि एनआरसीविरोधात देशभरात निदर्शने होत आहेत. त्यामुळे का मागे घेतले जावे. तसेच, एनआरसीची अंमलबजावणी केली जाणार नसल्याची ग्वाही देशाला दिली जावी, अशी मागणी त्यांनी ट्विटरवरून केली. देशाची दिशाभूल करण्यासाठी मोदी आणि शहा विसंगत दावे करत आहेत. त्यामुळे जनतेच्या मनातील भय आणखीच वाढत आहे. मोदींनी वस्तुस्थिती मांडण्यासाठी पुढे यावे, असेही गेहलोत यांनी पुढे म्हटले.