कोपरगाव – माजी आमदार अशोकराव काळे यांनी काकडी येथे विमानतळ आणले. कोपरगाव शहरात विविध शासकीय इमारती बांधल्या. यात न्यायालयाच्या इमारतीचा समावेश आहे. काकडी येथे विमानतळ कोणी आणले व न्यायालयाची इमारत कोणी बांधली हे तालुक्याच्या जनतेला माहिती आहे.
तरीही आमदारांना आपण न केलेल्या कामांचे प्रगतीपुस्तक भरविण्यासाठी 2012 साली पूर्ण झालेल्या न्यायालयाच्या इमारतीचा फोटो व काकडी विमानतळाचा फोटो छापून न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा केलेला प्रयत्न केविलवाणा केला. 5 वर्षात सत्ता असतांनाही माजी आमदार अशोकराव काळे यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची वेळ आमदारांवर आली, अशी टिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे यांनी केली. पोहेगाव येथे जाहीर सभेत काळे बोलत होते. ते म्हणाले, माजी आमदार अशोकराव काळे यांनी बंद पडलेली उजनी उपसा जलसिंचन योजना पुन्हा सुरु केली.
या योजनेसाठी पूर्ण क्षमतेने 24 तास वीज उपलब्ध व्हावी, यासाठी स्वतंत्र फिडर मंजूर करून आणले. माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांनी बांधलेला डाऊच बंधारा ज्यावेळी नैसर्गिक आपत्तीमुळे फुटला. त्यावेळी काळे यांनी स्वत: जातीने या बंधाऱ्यावर उभे राहून या बंधाऱ्याची चांगल्या प्रकारे दुरुस्ती करून काम पूर्ण करून घेतले.
त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आजही सिंचनासाठी पाणी उपलब्ध आहे. मात्र ज्यांनी मंजूर बांधला हा बंधारा किती वेळा फुटला आणि आज या बंधाऱ्याची काय परिस्थिती आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी मंजूर येथे जाऊन पाहिल्यावर तालुक्याच्या आमदार किती निष्क्रिय होते याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. मागील पाच वर्षात मतदार संघातील जनतेसाठी रस्त्यावरची, न्यायालयीन लढलो मी केलेला संघर्ष जनतेच्या हृदयात आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा दावा काळे यांनी यावेळी केला.
कालव्याची बैठक गोदावरी लाभक्षेत्रात
कालवा सल्लागार समितीची बैठक आमदार गेल्या पाच वर्षापासून गोदावरी कालव्याचे लाभक्षेत्र सोडून मुंबईला घेत आहे. या बैठकीला गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना उपस्थित राहाता येत नाही. आवर्तनासंबंधी अडचणी मांडता येत नाही. त्यामुळे येथून पुढील कालवा सल्लागार समितीच्या बैठका गोदावरी कालव्याच्या लाभ क्षेत्रात घेणार असल्याचे काळे म्हणाले.