राजगुरूनगर(रामचंद्र सोनवणे,प्रतिनिधी) :– देश प्रगतीपथावर गेला, स्वातत्र्यानंतर देशात अनेक क्रांती झाल्या. शिक्षण, रस्ते, वीज, पाणी, आरोग्य अशा अनेक जीवनावश्यक सेवा सर्व गावात उपलब्ध झाल्या; मात्र खेड तालुक्यात असे एक गाव होते की ते या सेवा सुविधांपासून वंचित होते. मात्र, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या अथक प्रयत्नामुळे या गावाला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जायला रस्ता झाला. यामुळे या गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला आहे.
आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या समवेत खेड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष कैलास सांडभोर, जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे यांनी यांनीही भेट दिली. खेड तालुक्यात शेवटच्या टोकावर चारही बाजूने मोठे जंगल, अभयारण्यात असलेले व निसर्गाचे वरदान लाभलेले येळवळी हे गाव आहे. जेमतेम 25 कुटुंबे आणि 100 च्या आसपास लोकसंख्या असलेले हे गाव वीज रस्ता आरोग्य पाणी आदी सेवा सुविधांपासून वंचित होते. वनविभाग आणि अभयारण्याचे कडक नियम यामुळे या गावात सेवा सुविधा मिळणे कठीण होते. नव्हे त्यांना या सुविधा देण्यासाठी शासनाने दुर्लक्ष केले होते. स्थानिक ग्रामस्थ आपले दुःख मांडत होते. त्या परिस्थितीत जीवन जगत होते.
या गावातील एक होतकरू तरुण सुभाष डोळस पुढे आला. खडतर परिस्थितीत त्याने शिक्षण घेतले. गावात राहून गावाच्या विकासासाठी प्रयत्न सुरू केले. आमदार, खासदार, वनविभाग, आणि संबंधित खात्याकडे पाठपुरावा केला. वनविभाग आणि अभयारण्य या दोन्हीच्या जुजबी नियमावलीत या गावाला कोणत्याच सेवा सुविधा मिळत नव्हत्या. आठ वर्षांपूर्वी आमदार दिलीप मोहिते यांनी या गावाला म्हणजे शेवटच्या टोकावर असलेल्या गावाला रस्ता, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण आदी जीवनावश्यक सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले.
वीज आणि रस्ता देण्यासाठी शसासांच्या माध्यमातून निधी मंजूर केला. भोरगिरी पासून 4 किमीचा कच्चा रस्ता तयार केला. भीमा नदीवर पूल बांधला त्यापुढे असलेल्या ओढ्यावर पूल बांधला. विजेचेचे खांब काही अंतरापर्यंत गेले वीजपुरवठा गेला. मात्र वन विभाग आणि अभयारण्य विभागाने पुढे खो घातला आणि रस्ता वीजचे स्वप्न पाहणाऱ्या येळवळी ग्रामस्थांचे स्वप्न अधुरे राहिले. मागील 5 वर्षे आमदार दिलीप मोहिते पाटील याना जनतेने नाकारले; मात्र त्यांचे प्रयत्न सुरू होते.
अखेर दिलीप मोहिते पुन्हा आमदार झाले आणि या गावाच्या विकासाचा प्रयत्न पुन्हा सुरू झाले. या गावातील सर्व परिस्थिती पत्रकारांनी नेहमीचे समोर आणली. त्याची दखल घेत रोटरी क्लब राजगुरूनगर यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. घर, गोठा, बांधण्यासाठी येथील नागरिकांना सर्व वस्तू डोक्यावर 1 किमीचा कडा असलेला डोंगर चालून खडतर वाटेने वाहून न्यावे लागत होते. त्यांचा हा संघर्ष पाहून या गावातील नागरिकांची सरकार किती अवहेलना करीत आहे हे जाणवत होते.
“गेली वर्षानुवर्षे येळवळी गावाला रस्ता नसल्याने जाण्या येण्यासाठी ग्रामस्थांना मोठा संघर्ष करावा लागत होता. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सरकारने यासाठी भरीव निधी उपलब्ध केल्याने त्यांना मनापासून धन्यवाद देतो. यागावापर्यंत डांबरी रस्ता होणार आहे. तीन पूल आणि मोठा रस्ता यामुळे शेवटच्या टोकापर्यंत जाता आले याचे सर्वच कार्यकर्त्यांना आनंद झाला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहणाऱ्या या ग्रामस्थांना सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या जातील.”
– दिलीप मोहिते, आमदार
नागरिकांनी दिल्या या समस्यांना तोंड
पिण्यासाठी झऱ्याचे पाणी, पाच किमी रस्त्यापर्यंत जंगलातून जीवघेणा प्रवास, कोणी आजारी पडलेच तर घोंगडीची झोळी करून त्यात पायपीट करत न्यावे लागत होते. गेली वर्षानुवर्षे या गावातील नागरिक जीवन संघर्ष करीत होते. शिक्षण, वीज आरोग्य रस्ते पाणी यासाठी ते परिस्थितीचा सामना करीत जगत होते.
“कित्येक वर्षानंतर गावाला रस्ते पाणी वीज आरोग्य सेवा मिळत नव्हत्या रस्त्याची मोठी अडचण होती, पावसाचे प्रमाण जास्त असते. चार ते पाच ओढे ओलांडून गावाकडे डोंगर चढण करून जावे लागते होते. रस्ता होण्यासाठी वन विभागाची मोठी अडचण होती. त्यातच उंच डोंगर होता. मात्र आमदार मोहिते यांनी आमच्या गावासाठी रस्ता केला. यामध्ये वनविभागाचे मोठे सहकार्य लाभल्याने आमचे गावात पहिल्यांदा गाडी आली तीही आमदारांची यांचा आम्हा ग्रामस्थांना खूप आनंद आहे. आता दळणवळणाच्या सोयी मिळतील.”
– सुभाष डोळस, ग्रामस्थ
तब्बल साडेतीन कोटींची मान्यता
अखेर भोरगिरी ते येळवळी या रस्त्यासाठी 4054 मार्ग, पूल व भांडवली खर्च 4 जिल्हा व इतर आदिवासी विभाग असा तब्बल साडेतीन कोटी रुपये खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाली. केवळ 12 महिन्यांत हे काम पूर्ण करायचे असल्याने इंडिकॉन कन्स्ट्रक्शनने हे काम युद्धपातळीवर सुरू केले. 60 टक्के काम पूर्ण झाल्याने या गावात पहिली गाडी आमदार दिलीप मोहिते पाटील यांची गेल्याने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना आता खऱ्या अर्थाने खेड तालुक्यातील येळवली गावाला स्वातंत्र्य मिळाले असल्याची भावना या गावातील ग्रामस्थांनी व्यक्त केली.