स्व. सुभाषआण्णांची सावली असलेले युवा नेतृत्व दौंड तालुक्याला लाभले, ते म्हणजे युवकांचे आशास्थान, लोकहितकारी आमदार ऍड. राहुलदादा कुल. दौंड तालुक्याच्या नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या विकासामध्ये भरारी घेणारे एक युवक नेतृत्व म्हणून जिल्हाही विकासात्मक नजरेने दादांकडे पाहत आहे.
दौंड तालुक्यामध्ये दादांनी सहकार, उद्योग, शिक्षण, कृषी, जलसंवर्धन, विशेष म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली आहे. आमदार कुल यांनी नागरिकांच्या मनात स्नेह, ऋणानुबंधाचे नाते निर्माण करणारे काम केले. विकासाभिमुख, अशी बिरूदावली त्यांच्या नावाभोवती आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळात एक अभ्यासू आमदार म्हणून दादांची ओळख आहे.
दादांनी गेल्या सहा वर्षांच्या कार्यकाळात प्रत्येक अधिवेशनात तालुक्याच्या विकासाबाबत आवाज उठविला आहे. याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने दादांना उत्कृष्ट संसदरत्न म्हणून पुरस्कार बहाल केला आहे. दादा आपला पूर्णवेळ तालुक्याच्या विकासाला देत आहेत. आजअखेर दादांनी सुमारे 1200 कोटी रुपयांचा विकास निधी खेचून आणला आहे. याची सर्वच विकासकामे आज प्रगतीपथावर आहेत. दौंड तालुक्यात दादांनी आमदार पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दौंड तालुका सुखी, समृद्धीने नांदत आहे.
राज्यात सर्वाधिक निधी हा दौंड मतदारसंघात आणला असल्याचेही दावा त्यांनी केला होता.
यातूच विरोधकांची झोप त्यांनी निवडणुकीपूर्वीच उडविल्याने कुल यांच्यावर केवळ टीकाच नाही तर जीवघेणा हल्ला करण्यापर्यंत विरोधकांची मजल गेली होती. परंतु कुल हे डगमगलेले नव्हते. विरोधकांना त्यांची कामे करू द्या. जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, मला काहीही होणार नाही. हा त्यांचा विश्वास सर्व काही सांगून गेला होता. ग्रामीण भागातील अर्थकारण गतिमान होण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लोकप्रतिनिधी या नात्याने प्रशासनात अधिकाऱ्यांशी समन्वय साधून अनेक कामे मार्गी लावली आहे.
गेल्या सहा वर्षांत केंद्रात भाजपची सत्ता असल्यामुळे त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीतून कामे मंजूर करून आणली आहेत. सखोल अभ्यास, त्यातून लोकहिताचा सहभाग, जनतेप्रति बांधिलकी, संयमी व्यक्तिमत्त्व, अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. राज्यातील सध्याच्या दुष्काळी स्थितीविषयी आमदार कुल यांना दूरदृष्टी आहे. जलसंपदा, कृषी विभागाचे नियोजन याकामी कमी पडते. कृषी विभागाचे अस्तित्व कुठेच दिसत नसल्याचा त्यांचा आरोप होता.
कमी पाण्यात कोणते पीक घ्यायचे याचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले तर दुष्काळ एखाद्या वर्षी पडला तरी शेतकऱ्यांच्या घरात धान्याच्या कणग्या मात्र भरलेल्या राहतील. त्यामुळे कृषी विभागाला तंत्रज्ञानाची जोड मिळणे गरजेचे आहे, असे त्यांनी मागील आमदारकीच्या कारकीर्दीत मत मांडले होते.
ठिबक सिंचनासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत तरतूद केली तरी शेतकऱ्यांकडे तेवढा पैसा नाही. त्यांना किमान 60 टक्के अनुदान द्यावे, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचीही आवश्यकता आहे. पूर्वी अनुदान दिले जात होते. परंतु, याचे वाटप वेळेत होत नाही, हे अन्यायकारक आहे. अनुदानासाठी आमदार कुल यांनी पाठपुरावा केला.
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय, गृह, शालेय शिक्षण व क्रीडा विभागांच्या कामाबाबत आमदार कुल यांना चांगला अभ्यास आहे. त्यामुळेच त्यांनी अनेक प्रश्न तडीस नेले आहेत. तालुक्याचा आणखी कायापालट करण्यासाठी आपण सर्वांनी दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे, अशा सर्व गुणसंपन्न, अष्टपैलू नेत्याला उत्तम आरोग्य लाभो, हीच त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.
– शब्दांकन : सचिन आव्हाड, (वरवंड)
राहुल अवचर, (देऊळगावराजे)