मिथून चक्रवर्ती यांचा बुधवारी वाढदिवस होता. त्यांना सोशल मीडियावर असंख्य जणांकडून शुभेच्छा दिल्या गेल्या. खरेतर आजचा दिवस त्यांच्यासाठी अन त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाचा दिवस आहे. मात्र, या आनंदात विरजण पडले आहे. त्याचे कारण पोलिसांनी आजच त्यांची चौकशी सुरू केली आहे.
मिथुनदांवर प्रक्षोभक भाषण दिल्याचा आरोप आहे. मिथुन कधीकाळी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसमध्ये होते. ममतांनी त्यांना राज्यसभेवरही पाठवले होते. नंतर चिटफंड घोटाळा आणि अन्य काही भानगडी प. बंगालमध्ये बाहेर आल्या.
त्यामुळे तृणमूलचे अनेक नेते सीबीआयच्या फेऱ्यात सापडले. मिथुनदांवर तसे काही शिंतोडे उडले नाहीत. मात्र त्यांची राज्यसभा गेली अन्य प्रतिमा काहीशी डागाळली.
भारतीय जनता पार्टीसोबत त्यांनी आपली दुसरी इनिंग सुरू केली. पंतप्रधान मोदी यांनी बंगालमध्ये जी पहिली महासभा घेतली त्याला मिथुन चक्रवर्ती यांनी हजेरी लावली होती.
त्यांना अत्यंत सन्मानाने स्टेजवर बसवण्यात आले होते. त्याच्या अगोदर व नंतर त्यांनी ममता सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली नव्हती.
आपण एक कोब्रा आहोत. चावलो तर तुम्ही फोटो बनाल अशा आशयाचे वक्तव्य की ट्विट त्यांनी केले होते. हेच विधान आता त्यांच्या अंगलट आले आहे. विधानसभा निवडणूक संपली आहे. ममता पुन्हा विजयी झाल्या आहेत. त्यांची ताकद पहिल्यापेक्षा जास्त वाढली आहे.
भाजपची दिल्लीहून आलेली फौज परत गेली आहे. मिथुनदा बंगालमध्येच आहेत अन् त्यांना आता ममताताईंच्या रागाचा सामना करावा लागणार आहे.
आक्रस्ताळेपणा हा ममतांचा स्थायीभाव असल्यामुळे मिथुनदांना किती आणि काय त्रास सहन करावा लागेल हे येत्या काळात समोर येईलच. त्यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधूनच त्यांना घेरण्याची तयारी केल्याचे दिसून येते आहे.