– माधव विद्वांस
श्रेष्ठ चित्रकार नंदलाल बोस यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म 3 डिसेंबर 1883 रोजी बिहारमधील खरगपूर या खेड्यात झाला (निधन 16 एप्रिल 1966). त्यांच्या वडिलांचे नाव पूर्णचंद्र व आईचे नाव क्षेत्रमणी होते. त्यांच्या मातोश्री देवीचे मुखवटे, खेळणी, कंथा या प्रसिद्ध बंगाली भरतकाम, हस्तकलांत कुशल होत्या. त्यामुळे आईचा कलेचा वारसा त्यांच्याकडे आला. शालेय शिक्षण संपल्यावर त्यांनी 1905 मध्ये कलकत्त्याच्या सरकारी कला विद्यालयातून चित्रकलेचा पाच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
सुप्रसिद्ध ‘टागोर संग्रहा’तील वस्तूंची सूची तयार करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. बर्याच रेखाचित्रांच्या त्यांनी प्रतिकृती तयार केल्या आणि टागोर परिवारातील मुलांचे कलाशिक्षक म्हणून ते काम पाहू लागले. वर्ष 1907 मध्ये भारतीय प्राच्यकला संस्थेने आयोजित केलेल्या प्रदर्शनात नंदलाल बोसांच्या शिवसती या चित्रास पारितोषिक मिळाले. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश व दक्षिणेकडील काही प्रमुख ऐतिहासिक कला स्थळांना भेटी दिल्या.
वर्ष 1911 मध्ये काही महिने अजिंठ्याला राहून तेथील चित्रांच्या प्रतिकृती त्यांनी तयार केल्या. सर्वसामान्य माणसाला चित्रांची गोडी लागावी म्हणून 1913 मध्ये त्यांनी काढलेली अनेक पटचित्रे नाममात्र किमतीस विकली. त्यांच्या कलात्मक निर्मितीत साधारण तीन प्रकार दिसून येतात. प्राचीन भारतीय परंपरा, राष्ट्रीय विचारसरणी व आधुनिकांची तांत्रिक प्रयोगशीलता हे ते तीन प्रकार. त्यांच्या मनाला असलेली प्राचीन भारतीय संस्कृतीची व परंपरेची ओढ प्रामुख्याने रामायण, महाभारत यांवर आधारलेली होती.
यामधे चित्रे-अग्नी, नल-दमयंती, कुरुक्षेत्र, अर्जुन, स्वर्णकुंभ अशी चित्रे आहेत. गोकुल ब्रत, कुमारी ब्रत यांसारखी त्यांची चित्रे त्यांच्या व्यक्तिगत शैलीची ओळख देतात. 1930-40 या कालावधीत त्यांची कला विविधतेने बहरत गेली. या दरम्यान त्यांची महात्मा गांधींशी भेट झाली व त्यांच्या प्रभावातून राष्ट्रीयत्वाची एक प्रबळ प्रेरणा त्यांच्या कला निर्मितीस लाभली.
‘हरिपूर पोस्टर्स’ या नावाने बहुजन समाजास आकृष्ट करू शकतील अशी सुमारे 60 चित्रे त्यांनी काढली. भारतीय लोकजीवनातील घटकांना त्यांनी चित्ररूप दिले. त्यामध्ये लोकसंगीतकार, कारागीर, शेतकरी अशी व्यक्तिचित्रे यांचा समवेश होता. वर्ष 1918 मध्ये रवींद्रनाथ टागोरांनी ‘विश्वभारती’ची स्थापना केली व 1919 मध्ये त्यातील ‘कला भवन’ शाखेचे प्रमुख म्हणून नंदलाल यांची नियुक्ती केली. 30 वर्षांहून अधिक काळ आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी शांतिनिकेतनमध्ये अध्यापन केले व अनेक चित्रकार तयार केले.
शांतिनिकेतनमधील चिनी भवनाच्या भिंतीवरील भित्तिलेपचित्रे ही त्यांच्या विशिष्ट प्रगल्भ शैलीची साक्ष देतात. त्यांनी विविध तंत्रविषयक प्रयोग केले. चित्रणसाधनांचा कमीत कमी वापर व भारतीय चित्रकलेच्या परंपरेची आलंकारिकता त्यांनी अधोरेखित केली.
त्यांची चित्रे कलकत्ता येथील ‘इंडियन म्युझियम’, ‘आशुतोष म्युझियम ऑफ इंडियन आर्ट’, ‘शांतिनिकेतन’, ‘म्हैसूरचा जगमोहन प्रासाद’ इत्यादी ठिकाणी जतन करून ठेवलेली आहेत. नंदलाल यांची चित्रे प्राचीन नसली तरीही भारतीय संस्कृतीचा वारसा असल्याचे पुरातत्व सर्वेक्षण विभागाने जाहीर केले आहे.