भारताचे माजी अष्टपैलू कसोटी क्रिकेटपटू अशोक मांकड यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1946 रोजी झाला. भारतीय क्रिकेटचे माजी कर्णधार विनू मांकड यांचे ते चिरंजीव. त्यामुळे घरातच त्यांना क्रिकेटचे बाळकडू मिळाले. मांकड यांनी किशोरवयातच हॅरिस चषक आंतरशालेय स्पर्धेत 348, 325 आणि 258 धावा केल्या. त्यामुळे 19 वर्षांखालील स्पर्धेत मुंबई आणि पश्चिम विभागीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांची निवड झाली.
कॉलेजमधील पहिल्या वर्षात त्यांनी रोहिन्टन बारिया चषक सामान्यांमध्ये मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. त्यावेळी त्यांनी अंतिम फेरीत नागपूर विद्यापीठाविरुद्ध 62, कर्नाटकविरुद्ध 131 आणि मद्रासविरुद्ध 152 धावा केल्या. त्यांनी त्यांच्या सतराव्या वाढदिवसाच्या एक आठवडा आधी प्रथमश्रेणी प्रकारात पदार्पण केले. वर्ष 1969-70च्या हंगामात न्यूझीलंडविरुद्ध कसोटी खेळण्यासाठी त्यांची निवड झाली. त्याच सामन्यात चेतन चौहान आणि अजित पै यांनीही पदार्पण केले होते.
न्यूझीलंडविरुद्धच्या डावात तीस धावा पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यानंतर त्यांना तिसऱ्या कसोटीसाठी संघातून वगळण्यात आले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मांकड यांची पुन्हा निवड झाली. यावेळी त्यांनी पहिल्या पाच डावात 74, 8, 64, 68 आणि 97 धावा केल्या. मांकड यांनी पहिल्या कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि पतौडीच्या नवाबसोबत चौथ्या विकेटसाठी विक्रमी 146 धावा केल्या. त्यानंतर दिलीप सरदेसाईच्या जागेवर उरलेल्या तीन कसोटीत त्यांना सलामीला पाठविले गेले.
मांकड आणि फारूख इंजिनियर यांनी मुंबईत 111, 43 आणि दिल्लीत 85 धावा काढल्या. त्यानंतर ते कारकिर्दीत आणखी 15 कसोटी सामने खेळले असले, तरी त्यांनी आणखी फक्त एक अर्धशतक झळकावले. दिल्ली येथे त्यांची सर्वोच्च धावसंख्या 97 होती. वर्ष 1970-71 मध्ये वेस्ट इंडिजमधील मालिकेत सुनील गावसकर यांच्यासोबत सलामीला मांकड यांनी चांगली भागीदारी केली होती, मात्र, त्यानंतर इंग्लंडच्या खराब दौऱ्यानंतर त्यांना वगळण्यात आले.
मांकड यांचे मारलेले तडाखे उत्कृष्ट असायचे; परंतु त्यांना कधीही निवड समितीचा विश्वास मिळवता आला नाही. तसेच फलंदाजीच्या क्रमात त्यांना कधीही निश्चित स्थान दिले गेले नाही. जवळपास 22 कसोटी सामन्यांमध्ये त्यांना क्रमांक 1 आणि 8 च्या दरम्यान कुठेही टाकले जायचे. त्यामुळे धावसंख्येतही सातत्य राहिले नव्हते. वर्ष 1976-77 मध्ये मायदेशात न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्यांनी चांगली कामगिरी केली; पण तरीही त्यांना वगळण्यात आले आणि त्या मोसमाच्या उत्तरार्धात इंग्लंडविरुद्ध केवळ एका कसोटीसाठी त्यांचा विचार करण्यात आला.
1977-78 मध्ये 50-80 च्या सरासरीने 508 धावा करून ऑस्ट्रेलियातील मालिकेत त्यांनी चांगली कामगिरी केली. परंतु त्यानंतर त्यांचा विचार केला गेला नाही. मांकड यांनी रणजी ट्रॉफीमध्ये, 22 शतकांसह 6,619 धावा केल्या आहेत. वर्ष 1980-81 मध्ये अंतिम सामन्यात त्यांनी दिल्ली विरुद्ध 265 ही सर्वोच्च धावसंख्या केली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी निवृत्ती घेतली. नंतर त्यांनी नवोदितांना प्रशिक्षण देणे सुरू केले आणि मुंबई, मध्य प्रदेश, रेल्वे आणि बडोदा येथे पदभार स्वीकारला.
मांकड यांचा विवाह माजी आशियाई टेनिस चॅम्पियन निरुपमा यांच्याशी झाला होता. त्यांचे दोनही मुलगे हर्ष व मिहीर टेनिसपटू होते. 1 ऑगस्ट 2008 रोजी त्यांचे निधन झाले.
माधव विद्वांस