अभिजात भारतीय गायन परंपरा जपणारे, चतुरस्त्र प्रतिभेचे श्रेष्ठ गायक कलावंत, नाट्यअभिनेते, गायनाचार्य व नाट्यसंगीताची परंपरा वृद्धिंगत करणारे संगीतकार भास्करबुवा रघुनाथ बखले यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1869 रोजी बडोदे संस्थानातील काठोर या गावी झाला.
त्यांच्या आवाजात माधुर्य असल्याने वर्गशिक्षक त्यांना संस्कृत श्लोकपठण करायचे प्रोत्साहन द्यायचे. या गुणामुळे कीर्तनकार पिंगळेबुवा यांच्याकडे त्यांची संगीतशिक्षणाची सोय झाली. त्यांना बडोद्यातील अनेक सार्वजनिक कार्यक्रमातून विशेषकरून गणपती उत्सवामध्ये गाण्याची संधी मिळू लागली. एकदा बडोद्याचे संस्थानिक सयाजीराजे यांनी त्यांचे गाणे ऐकले. महाराजे सयाजीरावांना कलेची आवड असल्याने ते नवोदित कलाकारांना नेहमीच मदत करायचे. त्यांनी मौलाबक्षांच्या सरकारी गायनशाळेत त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. एकदा या संगीतशाळेच्या समारंभात त्यांनी गाणे गायले आणि त्या कार्यक्रमाची बातमी “सयाजी-विजय’ या अंकात छापून आली.
पुढे ही गोष्ट भाऊराव कोल्हटकर यांच्या कानी गेली आणि त्यांनी भास्करबुवांना किर्लोस्कर मंडळीत आणले. नाटक मंडळीचा मुक्काम इंदूरला असताना भास्करबुवांचा आवाज सुप्रसिद्ध बीनकार उस्ताद बंदे अलीखॉं यांनी ऐकला आणि स्वतः होऊन त्यांनी भास्करबुवांना संगीतशिक्षणासाठी शागीर्द करून घेतले. भास्करबुवांनी ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर या तीनही घराण्याची गायकी आत्मसात केली होती. वर्ष 1886 मध्ये भास्करबुवांचा आवाज फुटल्यामुळे कंपनीतल्या स्त्री-भूमिका मिळणे अवघड होणार हे ओळखून त्यांनी आवाजासाठी मेहनत सुरू केली. पण कंपनीत अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळे ते बडोद्याला निघून गेले. तिथे त्यांनी उस्ताद फैज महंमदखॉं यांच्याकडे पुन्हा रियाज सुरू केला. त्यांनी 1886 ते 1894 या आठ वर्षांच्या कालावधीत ग्वाल्हेर घराण्यातील निवडक 150 ते 200 ख्याल व ठुमरी आत्मसात केल्या.
वर्ष 1892 मध्ये त्यांचे लग्न झाले. भाऊराव कोल्हटकरांनी गणेशोत्सवात त्यांचे गाणे ऐकले व त्यांना सर्व जुने विसरून पुन्हा किर्लोस्कर कंपनीत येण्याविषयी सुचविले आणि मानाने भास्करबुवा पुन्हा कंपनीत दाखल झाले. वर्ष 1896 ते 1901 या काळात रंगभूमीवर कामात व्यस्त असतानासुद्धा त्यांनी आपले उस्ताद नत्थन खॉं यांच्याकडे गायन शिक्षण चालूच ठेवले होते. उस्ताद नत्थन खॉं यांच्या मृत्यूनंतर गुरुपत्नी-मुलांची पोषणाची जबाबदारीपण पार पाडली तसेच त्यांचे पुत्र विलायत हुसेन खॉं यांनाही भास्करबुवांनी गायनाचे धडे दिले.
आर्थिक स्थैर्यासाठी 1906 पासून धारवाडच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये तीन वर्षे नोकरी केली. शेवटी ते पुण्यात स्थायिक झाले. “किर्लोस्कर भारत गायन समाजा’ची स्थापना पुणे येथे झाल्यावर या संस्थेसाठी त्यांनी खूप मेहनत घेतली व अनेक नवोदित गायकांना मार्गदर्शन केले. त्यांचे 8 एप्रिल 1922 रोजी आजाराने पुण्यात निधन झाले. त्यांनी संगीतबद्ध केलेली “नाथ हा माझा’, “स्वकुलतारकासुता’, “सुजन कसा’, “नरवर कृष्णासमान’, “एकला नयनाला’, “मम आत्मा गमला’, “मधुकर वन वन’, “थाट समरीचा’ ही गाणी आजही लोकप्रिय आहेत.
माधव विद्वांस