उत्तर पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी प्रसिद्ध असलेले एक मुत्सद्दी सखारामबापू बोकील यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचे पूर्ण नाव सखाराम भगवंत बोकील. त्यांचा जन्मदिनांक, जन्मस्थळ, लहानपण याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. त्यांचे पूर्वज पणतोजी (पंताजी) गोपीनाथ हे अफझलखानाकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा निरोप घेऊन गेलेले वकील होते. सखारामबापूंचे चुलतभाऊ महादजी यमाजी छत्रपती संभाजी महाराजांच्या सेवेत होते. रायगडच्या पाडावानंतर ते छत्रपती शाहूंबरोबर औरंगजेबाच्या कैदेत होते. पुढे शाहूंनी त्यांस हिवरे गाव व कुलकर्णी वतन करून दिले. त्यांस पुत्रसंतती नव्हती म्हणून बापूंचा ज्येष्ठ भाऊ निंबाजीस ते वतन वारसाहक्काने मिळाले.
बापूंचा जन्म बहुधा हिवरे येथेच झाला असावा. बापूंचा उल्लेख शनिवारवाड्याच्या बांधकामप्रसंगी आलेला दिसून येतो. सखारामबापू अगोदर महादजीपंत पुरंदरे यांच्याकडे कारकून व शिलेदार होते. बाळाजी बाजीरावांनी त्यांना 1746 मध्ये सदाशिवरावभाऊंबरोबर कर्नाटकच्या स्वारीवर पाठविले होते. या स्वारीत पेशव्यांनी भरपूर धनदौलत जमवून छत्रपती शाहूंचे कर्ज फेडले. पुढे रघुनाथरावांबरोबर गुजरात (1754) व उत्तर हिंदुस्थान (1758) अशा दोन स्वाऱ्यांत त्यांनी भाग घेतला. पेशव्यांनी रघुनाथरावांचा कारभारी म्हणून त्यांची नियुक्ती केली. बापूंच्या तंत्राने राघोबा वागत असे. तसेच थोरल्या माधवरावांच्या वेळी सुरुवातीस राघोबा बापूंच्या सल्ल्यानुसार राज्यकारभार पाहात असे.
माधवरावांना त्यांच्याबद्दल माहिती मिळाल्याने त्यात हस्तक्षेप करताच बापूंनी कारभारीपद सोडले. तत्पूर्वी रघुनाथरावांनी निजामाचा पराभव केला; पण सखारामबापूंच्या सांगण्यावरून त्याचा पुरता मोड केला नाही. उलट निजामअली व जानोजी भोसले यांची मदत घेऊन पेशव्यांचा पराभव केला, तेव्हा चुलता-पुतण्यात समझोता होऊन पुन्हा राघोबा वरचढ झाले. त्यांनी बापूस कारभारी नेमून पेशव्यांचे समर्थक गोपाळराव पटवर्धन यांची जहागिरी जप्त केली आणि सखारामबापूस नऊ लाखांची जहागीर दिली. त्यामुळे माधवराव व राघोबा यांच्यात संघर्ष सुरू झाला.
कर्नाटकात हैदर अलीवरील 1764 च्या लढाईचे सर्व अधिकार माधवरावांनी घ्यावेत, असा बापूंनी आग्रह धरला. माधवरावांनी या युद्घप्रसंगी बापूस बरोबर घेतले. माधवराव युद्धाच्या हालचालींत बापूंचा सल्ला घेत. मात्र, यानंतर बापूंचा वाढलेला प्रभाव त्यांना जाचक वाटू लागला. त्यांनी राघोबास 1768 मध्ये नजरकैदेत ठेवल्यानंतर बापूंची कारभारी पदावरून उचलबांगडी केली; पण त्यांची जहागिरी पूर्ववत त्यांच्याकडेच ठेवली.
मरणापूर्वी माधवरावांनी बापूंची योग्यता लक्षात घेऊन त्यांस पुन्हा कारभारी नेमले आणि त्यांच्या समक्ष राघोबास भावाचा (नारायणराव) सांभाळ करण्यास सांगितले (1772). नारायणरावांच्या कारकिर्दीत (1772-73) बापूच राज्यकारभार पाहात असे. नारायणरावांच्या खुनानंतर निजामावरील स्वारीत बापू होते (1774) परंतु काहीतरी निमित्त साधून ते माघारी आले व बारभाईंच्या कारस्थानात सामील झाले. नाना फडणवीस व मंडळींनी त्यांच्याकडेच राज्यकारभाराचे सर्वाधिकार दिले. नारायणरावांची पत्नी गंगाबाईंच्या निधनानंतर बापू व नाना यांच्यात मतभेद झाले.
पुढे मोरोबादादा फडणवीसांनी इंग्रजास राघोबाला घेऊन येण्याविषयी विनंती केली. त्यास बापूंची अंतस्थ संमती होती. पुढे वर्ष 1779 मध्ये इंग्रज व रघुनाथराव यांबरोबर बारभाईंच्या वडगाव तहप्रसंगी बापूंचा शत्रूपक्षाशी झालेला पत्रव्यवहार उघडकीस आला, तेव्हा नानांनी त्यांस कैद केले आणि प्रथम सिंहगडावर आणि नंतर प्रतापगड व रायगड येथे ठेवले. तिथेच त्यांचे 2 ऑगस्ट 1781 रोजी देहावसान झाले.
माधव विद्वांस