येत्या चार वर्षांत देशभर संपूर्ण दारूबंदी
नवी दिल्ली – देशभर संपूर्ण दारूबंदी अंमलात आणावयाचा कार्यक्रम जास्तीत जास्त 4 वर्षांत संपला पाहिजे. यापेक्षा जास्त अवधी लागला तर दारूबंदी कार्यक्रमाची परिणामकारक अंमलबजावणी होणे कठीण जाईल, असे पंतप्रधान मोरारजी देसाई म्हणाले. सर्व राज्यांत शक्य तितक्या लवकर दारूबंदी केल्यामुळे उत्पन्न बुडेल हा विचार आपण करता कामा नये. कारण दारूमुळे जे उत्पन्न वा महसूल मिळेल त्यापासून समाजाला फायदा होणार नाही. दरोडे घालून इस्पितळे उभारावयाची कल्पना जशी हास्यास्पद तसेच दारूच्या व्यसनापासून पैसा मिळविणेही हास्यास्पद.
हृदयाची झडप बदलली
मुंबई – कऱ्हाडमधील कासम अब्दुल नावाच्या गरीब मुलाच्या हृदयात एक झडप कार्य करीत नव्हती. ती बदलून दुसरी झडप त्याचे हृदयात बसविण्याची यशस्वी शस्त्रक्रिया मुंबईचे एक शस्त्र वैद्य डॉ. सक्सेना यांनी नुकतीच पार पाडली. आता त्या मुलाची प्रकृती सुधारत आहे.
“संपूर्ण क्रांती’ हातभार लावा
पाटणा – येथे सर्वोदयी कार्यकर्त्यांच्या परिषदेस जनतेने सर्वतोपरी साहाय्य करावे व आर्थिक साहाय्यही भरपूर करावे अशी विनंती जयप्रकाश नारायण यांनी केली आहे. सर्वोदयी कार्यकर्ते संपूर्ण क्रांतीच्या दिशेने कारभार करीत आहेत. म्हणून जनतेने त्यांना मदत दिली पाहिजे, असेही ते म्हणाले.