सांगली (प्रतिनिधी) –उत्तर भारतीयांना त्यांच्या गावी परत पाठवण्यासाठी उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे श्रमिक विशेष रेल्वे रविवारी रात्री मिरज रेल्वे स्थानकातून रवाना झाली. रात्री 8 वाजता कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते परप्रांतीय मजुरांना तिकीट आणि जेवण देऊन गोरखपूरला रवाना करण्यात आले. 24 बोगीच्या विशेष रेल्वेतून प्रत्येक बोगीत 52 याप्रमाणे 1184 प्रवाशांची व्यवस्था करण्यांत आली होती. दुपार पासून परप्रांतीय प्रवाशांना बसमधून रेल्वे स्थानकाकडे आणण्यात आले.
एका बस मध्ये पंचवीस प्रवासी याप्रमाणे दोन बसेसला एका नोडल अधिकार्याची नियुक्ती करण्यांत आली होती. 16 नोडल अधिकार्यांनी नोंदणीकृत 1150 प्रवाशांना 32 बसेसमधून रेल्वे स्थानकात आणले. स्थानिक पोलिसांचा रेल्वे स्थानकाबाहेर बंदोबस्त होता.महसूल अधिकार्यांनी रेल्वे स्थानकात प्रवेशापूर्वी प्रवाशांच्या ओळखपत्राची तपासणी केली. प्लॅटफॉर्मवर पोलिस बंदोबस्तात रेल्वे बोगीत सर्वाना प्रवेश देण्यात आला.जे कामगार जाणार आहेत. त्याशिवाय कोणीही रेल्वेत घुसणार नाहीत याची खबरदारी रेल्वे पोलिस व सुरक्षा दलाने घेतली होती.
बोगीत प्रवाशांना रेल्वे तिकीटासोबत दोन पाण्याच्या बाटल्या व जेवण देण्यात आले.सर्वाना 30 तासांच्या प्रवासासाठी गुळपोळी, थालपीठ देण्यात आले.रेल्वे टिकीट निरीक्षकांनी प्रत्येक बोगीत प्रवाशांची खात्री केली.यावेळी पोलिस उपाधीक्षक संदिपसिंग गिल,रेल्वे सुरक्षा बल पोलीस निरीक्षक , स्टेशन प्रबंधक पनीर सेल्वम, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार रणजित देसाई ,रेल्वे मेडिकल ऑफीसर सतीश मंडला यांच्यासह पोलीस व रेल्वे अधिकारी उपस्थित होते.
ऑनलाईन नोंदणी केलेल्या प्रवाशांना स्वीकारण्याची तयारी उत्तर प्रदेश सरकारने या कामगारांना दर्शविल्याने गोरखपूरसाठी दोन विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. मिरजेतून रविवारी पहिली रेल्वे रवाना झाली असून मंगळवारी दुसरी रेल्वे पाठविण्याची तयारी सुरु आहे.