मुंबई – शिवसेना आणि शिंदे गटातील सत्तासंघर्षावरील निकाल केव्हाही येऊ शकतो. अशात निकाल आल्यानंतर शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास राज्यातील सरकारच नेमकं काय होणार असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. त्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.शिंदे भाजप सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी आता अजित पवार यांनी भाजपसोबत येण्याबाबत भाष्य केले आहे.
राज्यात सध्या राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेले आहे. अजित पवारांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा निर्णय आहे. ते सरकारसोबत येत असतील तर चांगली गोष्ट आहे. राजकारणातील विरोधी पक्षात बसून आमच्यावर टीकाटिपण्णी करण्यापेक्षा ते सोबत येत असतील तर आणखी गोड बातमी काय पाहिजे तुम्हाला असं सत्तार यावेळी म्हणाले. एक वृत्तवाहिनीशी बोलताना सत्तार यांनी सध्याच्या घडामोडींवर भाष्य केले.
कोर्टाच्या निर्णयाचा सरकारवर काही परिणाम होईल का असं विचारले असता सत्तार म्हणतात,”सुप्रीम कोर्टाचा निर्णय वेगळा भाग आहे. ते सुप्रीमो आहे. परंतु ही राजकीय घडामोड आताच घडलेली नाही. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात सुसंवाद आहे कि वाद आहे यावर मी बोलणं योग्य नाही” असं देखील सत्तार यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच सरकारला कोणताही राजकीय धोका नसून हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचे देखील यावेळी त्यांनी सांगितले.
राज्यात सध्या वेगवान घडामोडी सुरु आहेत. अजित पवार हे भाजपसोबत जाणाऱ्या असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहे. अशात शिंदे गटाचं नेमकं काय होणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.