कोपरगाव मुख्याधिकारी, अधिकारी, व्हॉल्व्हमन अनभिज्ञ
कोपरगाव – पाण्याच्या तुटवड्यामुळे एकीकडे नगरपालिका सहा दिवसाआड नागरिकांना पाणी देत असताना शहरातील शिंदे-शिंगीनगर भागातील खडकी, समतानगर भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाल्याने टाकीतून तब्बल दहा ते पंधरा फुट उंचीने पाणी उडून लाखो लिटर पाणी वाया गेले.
पालिकेचे मुख्याधिकाऱ्यासह पाणीपुरवठाचे अधिकारी व्हॉल्व्हमन यांचे दुर्लक्ष होते. सायंकाळी उशीरा पत्रकारांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता ऋतुजा पाटील यांना टाकीतून पाणी वाया जात असल्याची माहिती दिल्यानंतर पालिका यंत्रणा खडबडून जागी झाली.
त्यातहि नेमके पाणी वाया कुठून व कशामुळे जात आहे. हेच अधिकारी, कर्मचाऱ्यांना समजून शकले नाही.
कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून चुकीची माहिती देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांवर पालिका अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने व कर्मचारी आपले कर्तव्य बजावण्यात कसूर केल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. यामध्ये पालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे.
दिवसभर लाखो लिटर पाणी वाया जात असताना पालिकेच्या व्हॉल्व्हमनपासून ते मुख्याधिकाऱ्यांपर्यंत कोणालाही याची कणभर कल्पना नव्हती. यावरून पालिका प्रशासन किती सतर्क आहे,हे दिसून येते. त्याबरोबर लाखो लिटर वाया जाणारे पाण्याचे ठिकाण टाकीच्या जवळ जावून दिसले नाही. अखेर पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता पाटील यांनी टाकीचा पाणीपुरवठा मुख्य जलवाहिनीवरून बंद करून पाण्याची गळती थांबवली.
शहरामध्ये विक्रमी 23 दिवसाआड पाणीपुरवठा करणाऱ्या या नगरपालिका प्रशासनाला पाण्याचे महत्त्व अजूनही कळले नाही, म्हणूनच की काय पाणी गळतीकडे गांभीर्याने पहिले जात नाही. महिन्याला जलवाहिनी लिकेजच्या नावाखाली लाखो रुपयांचे बिले काढली जातात. तरी हि शहराचा पाण्याचा तुटवडा कायमच आहे. त्रस्त झालेल्या कोपरगावकारांना क्षारयुक्त दुषित पाणी जारच्या नावाखाली विकत घेऊन आपली तहान भागवत आहे. कोपरगाव पालिकेला पाण्याचे कधी चांगले दिवस येणार हा प्रश्न आहे.
पाण्याच्या गळतीचे कारण समजेना
पाणी गळतीवर मुख्याधिकारी, पाणीपुरवठा अभियंता पाटील म्हणतात, व्हॉल्व खराब झाल्याने पाणी वाया जात आहे. पाणीपुरवठा विभागातील एक कर्मचारी हे पाणी ओव्हरफ्लोचे असल्याचे सांगतो तर व्हॉल्व्हमन तिसरीच चुकीची माहिती देवून सर्वांची दिशाभूल करत होता. त्यामुळे नेमके कुठे, काय चालले तेच अधिकारी, कर्मचारी यांना समजत नव्हते.