कोपरगाव – चालू वर्षी पर्जन्यमान चांगले झाल्याने रब्बीचे दोन व उन्हाळ पाच आवर्तने मिळावीत, अशी आग्रही मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी जलसंपदामंत्री छगन भुजबळ यांच्याकडे गोदावरी उजवा व डावा कालवा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केली आहे. आवर्तन काळात नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्यावरील भागात मोठ्या प्रमाणात पाणी उचलले जाते. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
कोल्हे म्हणाल्या, गोदावरी कालव्यांना रब्बीत दोन, तर उन्हाळ्यात पाच पाण्याचे आवर्तने मिळालीच पाहिजेत. त्यांच्या तारखा अगोदरच जाहीर कराव्यात. म्हणजे शेतकऱ्यांना शेती पिकांचे नियोजन करता येईल.वितरिका दुरुस्तीची कामे नाशिक पाटबंधारे खात्याने करावे.
पालखेड कालव्यालाही ठरल्याप्रमाणे आवर्तन देण्यात यावे. कर्मचारी वर्गाची कमतरता असल्याने आवर्तन काळात विस्कळीतपणा येतो. ही पदे तातडीने भरावीत. समितीची बैठकीची माहिती सात दिवस अगोदर देण्यात यावी, म्हणजे त्याप्रमाणे नियोजन करता येते, असेही कोल्हे म्हणाल्या.