किरण जगताप
कर्जत – गेली अनेक वर्षे कर्जत-जामखेडमध्ये भाजपाचे वर्चस्व होते. आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून त्याला ब्रेक लागला आहे. कोमात गेलेल्या राष्ट्रवादीला ‘अच्छे दिन’ आले आहेत. कर्जतमधून मोठे नेतृत्व तयार होऊ न शकल्याने अखेर पवारांनाच येथे विशेष लक्ष घालावे लागले. पवारांनी लक्ष घातल्यानंतर निकाल काय येतो याचा प्रत्ययही अख्ख्या महाराष्ट्राने घेतला. कर्जत-जामखेड राज्याच्या राजकीय पटलावर गाजले.
कर्जत-जामखेड हा राष्ट्रवादीसाठी अतिशय मरगळ आलेला मतदारसंघ होता. अनेकदा प्रयत्न करूनही हा मतदारसंघ ताब्यात न आल्याने याकडे पक्षातील वरिष्ठांचे दुर्लक्ष होत राहिले. मुळात येथून तयार झालेल्या नेतृत्वाला मोठी उंची गाठता आली नाही. वैचारिक बैठक व व्यापक विचारांचा अभाव, राजकारणाला व्यवसायिक दृष्टिकोनातून पाहण्याची पद्धती अशा कारणांमुळे अनेक पुढाऱ्यांचे पुढारपण जिल्हा परिषदेपुरतेच सीमित राहिले.
राजकारणात फक्त महत्त्वाकांक्षा असून चालत नाही तर सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडण्याची मनोवृत्ती असावी लागते याचा अनेकांना विसर पडला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उभारी घेणारे नेतृत्व कर्जतमध्ये तयार न झाल्याने पक्षालाही मर्यादा आल्या. अखेर रोहित पवार यांनी मोठे आव्हान स्वीकारून यश संपादन केले.
आता कणखर नेतृत्व लाभल्याने मतदारसंघातील नेते आणि कार्यकर्त्यांना मोठी उभारी आली आहे. आमदार रोहित पवार यांचा जनतेशी थेट संपर्क सुरु आहे. अडीअडचणी समजून घेत त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची पद्धती कोषातून बाहेर न पडलेल्या कर्जत तालुक्यातील अनेक नेत्यांसाठी दिशादर्शक ठरत आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडूनही जनतेचे प्रश्न समजून घेण्याचा काहीसा प्रयत्न केला जात आहे.
आत्तापर्यंत मोठी पदे घेऊन फक्त मिरवणाऱ्या अनेक नेत्यांची आता ओढाताण होत आहे. पवारांच्या नजरेत भरण्यासारखी कामे केली तरच त्यांचा आता टिकाव लागणार आहे. कधी नव्हे एवढा जनतेशी संवाद सुरू झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला हळूहळू उभारी येत आहे. पंचायत समितीची सत्ता काबीज केल्याने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस अधिक सक्रिय होताना दिसत आहे. मोठे संघटन असतानाही सत्तेच्या अभावामुळे त्यांना कर्तृत्व सिद्ध करता आले नव्हते. आता सर्व परिस्थिती अनुकूल असल्याने कर्जतमधील राष्ट्रवादी मोठ्या जोमाने वाढण्याचे संकेत मिळत आहेत.