औरंगाबाद – करोना व्हायरसच्या लॉकडाऊनदरम्यान अनेक स्थलांतरित मजूर आणि कामगार आपापल्या राज्यात परतत आहेत. मात्र, लॉकडाऊननंतर महाराष्ट्रात परत येताना अशा स्थलांतरित कामगारांना नावनोंदणी करावी लागेल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. तसेच राज्यात स्वत:चा पुरेसा कामगारवर्ग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
औरंगाबादमधील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी करोनास्थितीचा आढावा घेतला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी औरंगाबाद जिल्हा “ग्रीन झोन’मध्ये येण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या.
देसाई म्हणाले, लॉकडाऊनमुळे सध्या रोजगार नसल्याने स्थलांतरित मजूर परतले आहेत; परंतु राज्यातील उद्योग-व्यवसाय सुरळीत सुरू झाल्यानंतर हे मजूर परत येऊ शकतात. सध्या आपल्याकडे उद्योगांना पुरवठा करण्यासाठी पुरेसा कामगारवर्ग आहे. राज्य शासनाने उद्योगांना परवानगी दिली असली तरी पूर्ण क्षमतेने औद्योगिक क्षेत्र खुले करण्यात आलेले नाही.
सध्या सुरू असलेल्या उद्योगांना कुशल, अकुशल कामगार पुरविण्यासाठी औद्योगिक कामगार ब्युरो स्थापन करण्याचा सरकारचा विचार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून स्थानिक तरुणांची नोंदणी करून ते उद्योगांना पुरविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
लॉकडाऊन पूर्णपणे शिथिल झाल्यानंतर राज्यातील उद्योग-व्यापार पुन्हा हळूहळू मार्गावर येतील. यानंतर इतर राज्यांतील मजूर परत आल्यास त्यांची नावे राज्य सरकारकडून नोंदवण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.