म्हसवड – लाखो भाविकांचे श्रद्धस्थान आणि म्हसवडचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धनाथाची यात्रा अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली. या यात्रेसाठी राज्यासर परराज्यातूनही मोठ्या प्रमाणात भाविक येतात. त्यामुळे यात्रेपूर्वीच यासाठी शासकीय पातळीवर यात्रेचे नेटके नियोजन केले जाते.
मात्र यंदा यात्रा अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे. तरीदेखील पालिका प्रशासनाकडून यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोण्यातही हालचाली सुरु नसल्याने पालिकेला कसलेही गांभीर्य राहिले नसल्याचेच स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे पालिकेचे मुख्याधिकारी हे नेहमीच रजेवर असल्याचे पालिकेतूनच सांगितले जात असल्याने सध्या म्हसवड पालिकेचा कारभार हा रामभरोसे सुरु आहे.
म्हसवड शहरात डेंग्यू, मलेरिया, टायफॉईट, यासारख्या साथीच्या आजाराने धुमाकुळ घातला असून असंख्य रूग्ण सरकारी व खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहे. तसेच पंधरा दिवसावर म्हसवडची रथयात्रा येवून ठेपली असून पालिकेकडून कोणतीही उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही, कारण पालिकेच्या मुख्याधिकारीच गैरहजर असल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे. लाखो भक्ताचे कुलदैवत असलेल्या सिध्दनाथ यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक येत असतात.
त्यांच्या सुरक्षेसाठी पालिकेकडून उपाययोजना करणे गरजेचे असते, मात्र याबाबत अद्यापपर्यंत पालिकेने कोणतीच उपाययोजना केली नाही. या यात्रेच्या नियोजनाबाबत आत्तापर्यंत पालिकेने दोन बैठका घेणे गरजेचे होते. मात्र पालिकेची एकही मिटींग झाली नाही. त्यामुळे या यात्रा नियोजनाबाबत पालिकेला कसलेच गांभीर्य नसल्याचे दिसते. या यात्रेचा रथोत्सव हा 27 नोव्हेंबर रोजी असून या दिवशी शहरात चार ते पाच लाख भाविक येत असतात.
या लाखो भक्तांच्या सुरक्षेची व इतर सुविधा पुरवण्याची जबाबदारी ही पालिका प्रशासनाची असून याबाबत पालिकेने उपाययोजना करणे गरजेचे असताना पालिकेकडुन कोणतीही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. या रथोत्सवात श्रींचा रथ मार्ग हा माणगंगा नदीपात्रातून असून सध्या या रथमार्गातील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने रथमार्ग बदलून बायपास मार्गाने म्हसवड बसस्थानक मार्गे सातारा-पंढरपूर मार्गाने शहर प्रदक्षिणा होणार आहे. त्यामुळे हा संभाव्य रथमार्गावरील अतिक्रमणे काढून हा रथमार्ग मोकळा करणे गरजेचे आहे.
दरम्यान, रथमार्गातील सातारा-पंढरपूर मार्गावरील वडजाई ओढ्यात सुरू असलेल्या मोहोळ-सातारा या मार्गाचे काम सुरू असल्याने रथमार्गात पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य आहे. या यात्रा नियोजनासाठी शुक्रवार रोजी होणारी जिल्हा प्रशासनाची मिटींग रद्द झाल्याने या यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांच्या वाहन पार्किंग, एस. टी. महामंडळ, विजवितरण कंपनी, आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासनासह विविध विभागाकडुन कोणत्या उपाययोजना करण्यात येणार आहेत, याचाही आढावा बैठक रद्द झाल्याने यात्रा कालावधीत प्रशासनातर्फे कोणत्या उपाययोजना करण्यात येणार आहेत हा प्रश्न निर्माण झाला आहे.