वाई तालुक्यात रब्बीच्या पेरणीची धांदल
वाई – जिल्ह्यासह वाई तालुक्यात नोव्हेंबर महिला उलटला तरी परतीचा पाऊस सुरुच राहिल्यामुळे खरीपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय पाऊस थांबला नाही तर रब्बी हंगाम होणार का? याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होती. मात्र चार दिवसांपासून पाऊस उघडल्याने आता शेतकऱ्यांची तालुक्यात रब्बीच्या पेरणीसाठी धांदल उडाली आहे.
यावर्षी सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस पडल्याने निसर्गाने अनेक वर्षांचे रेकॉर्ड तोडलेले आहेत. परतीच्या पावसाने तर खरीप हंगाम वाया गेला, त्यामुळे सध्या पावसाने उघडीप दिल्याने रब्बी हंगामाच्या तयारीत शेतात राबताना दिसत आहे. खरीप हंगाम वाया गेल्याने हंगामातील पाऊस एवढा लांबला की रब्बी हंगाम पदरात पडतोय की नाही याची शंका निर्माण झाली होती.
परंतु चार दिवसांपासून पाऊस पूर्णपणे उघडला असून चांगली थंडी पडण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण तालुक्यातील बळीराजा रब्बी हंगाम यशस्वीतेसाठी कंबर कसलेला दिसत असून शेतातील कामात व्यस्त झाला आहे. धरणक्षेत्रातही पावसाचे प्रमाण चांगले असल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून यावर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाही.
तालुक्यातील सर्व प्रकारचे बंधारे, तलाव, बलकवडी, नागेवाडी व धोम धरणात पाण्याचा पुरेसा साठा झालेला आहे. सध्या निसर्गाचा लहरीपणा हा नेहमीच शेतकऱ्यांना अडचणीत आणत असल्याचे अनेक वर्षांपासून सिद्ध झाले आहे. त्यामुळे सध्या वाई तालुका द्विधा मनस्थितीत होता. थोड्या दिवसापूर्वी परतीच्या दमदार पाऊसामुळे शेतकऱ्यांची झोप उडवली होती. एक हंगाम वाया गेल्याने रब्बी हंगामसुध्दा वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.
वाईच्या पश्चिम भागातील पावसाला जोर असल्याने भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, परंतु सध्या पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने दिवाळीनंतरचा सिझन चांगला पदरात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरीप हंगाम वाया गेल्याने या तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे अडचणीत आलेला आहे. तालुक्यातील बागायती क्षेत्र धोक्यात येवून उत्पन्नात मोठी घट झालेली आहे. पालीभाज्या खराब झाल्याने बाजारात त्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागत व पेरणीसाठी बॅंका, सोसायट्यांचे आर्थिक कर्ज घेतले आहे. तो शेतकरी पूर्णपणे अडचणीत सापडलेला असताना उघडीप मिळाल्याने काही अंशी शेतकऱ्यांना थोडी आशा निर्माण झाली आहे. संपूर्ण वर्षाचे आर्थिक गणित कोलमडले असून चांगला पाऊस पडल्याने सण, उत्सवावर त्याचा विपरीत परिणाम होवून बाजारात पूर्णपणे शांतता होती. पुरेसा पाऊस पडल्याने रोगराईला डोके वर काढण्यास वाव मिळणार नाही, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर येणार नाही. एकंदरीत संपूर्ण वाई तालुका दमदार पावसामुळे शेतीच्या कामात व्यस्त आहे.