प्राधान्य मार्गामुळे इतर काम रखडले
पुणे – डिसेंबर 2019 अखेर काहीही करून मेट्रोचा एकतरी मार्ग सुरू करण्याचा अट्टाहास महामेट्रोने धरला आहे. त्यासाठी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेली कामे थांबवित मनुष्यबळ तसेच इतर यंत्रणा प्राधान्यमार्गाच्या कामात जुंपली आहे. परिणामी अर्धवट सोडलेल्या कामांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. तर ऐन कोंडीच्या वेळी महामेट्रोने नेमलेले वॉर्डनच गायब असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर काम सुरू आहे. या 32 किलोमीटरच्या मार्गांचे काम पूर्ण करण्यासाठी महामेट्रोला 2021 चे उद्दीष्ट आहे. त्या अनुषंगाने 2018 ते आतापर्यंत कामाचा वेग चांगला होता.
त्यामुळे 31 डिसेंबर 2019 अखेर वनाज ते गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी-चिंचवड ते दापोडी हे प्राधान्य मार्ग निश्चित केले. मात्र, त्याचवेळी नदीपात्र, महापालिका भवन, आरटीओ कार्यालय ते बंडगार्डन रस्ता, नगररस्ता या ठिकाणी एकाचवेळी काम सुरू केले. मात्र, अपूरे मनुष्यबळ आणि नियोजनाचे वेळापत्रक कोलमडल्याने महामेट्रोने आपला प्राधान्यक्रम बदलला. त्यात, प्रधान्य मार्ग मागे ठेवत, पिंपरी-चिंचवड ते दापोडी या 7 किलोमीटरचा मार्ग सुरू करण्याचे नियोजन केले.
त्यामुळे पुण्यातील बहुतांश मनुष्यबळ तसेच यंत्रणा पिंपरीतील कामासाठी वळविली. मात्र, हा मार्गही पूर्ण होत नसल्याचे लक्षात येताच मेट्रोने पिंपरी-चिंचवड ते संत तुकारामनगर हा 3 किलोमीटरचा प्राधान्यक्रम निश्चित केला आहे. तर हे काम पूर्ण करण्यासाठी अवघे 40 दिवस आहेत. त्यामुळे सर्व ठिकाणची कामे बंद करून मेट्रोने त्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे.
वाहतूक कोंडीचा मनस्ताप
वाहनांची बेसुमार संख्या, अरूंद रस्ते यामुळे वाहनांचा वेग सरासरी ताशी 18 किलोमीटरवर आला असतानाच मेट्रोकडून तीन प्रमुख रस्त्यांवर सुरू असलेल्या कामामुळे वाहनांची वेग मर्यादा ताशी 9 ते 10 किलोमीटरपर्यंत खाली आहे. मेट्रोकडून महापालिका भवनासमोर अर्धवट काम बंद केल्याने येथील कोंडीचा ताण शिवाजी रस्ता, जंगली महाराज रस्त्यावर येत आहे. परिणामी पेठांमध्येही कोंडीचा सामना करावा लागत आहे. अशीच स्थिती आरटीओ कार्यालय ते रेल्वे डीआरएम कार्यालय, बंडगार्डन रस्त्यावरही आहे. त्यातच, काम बंद असले तरी रस्त्यांच्या दोन्ही बाजूना मेट्रोने बरिकेंडींग केले असून त्यामुळे आधीच रस्ता अरूंद झाला आहे. त्यात, मेट्रोचे कामही बंद आहे. त्यामुळे कोंडीचा त्रास आहे.
महामेट्रोकडून एकाचवेळी सर्व ठिकाणी काम करणे आवश्यक आहे. प्राधान्यक्रमामुळे त्यांच्याकडून इतर भागांतील काम बंद केले असेल आणि त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्यास त्यांच्याकडे विचारणा केली जाईल. हे काम रस्त्यावर असल्याने ते सुरू केल्यानंतर न थांबविता पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करणे आवश्यक आहे. याबाबत मेट्रोला विचारणा करून त्यांच्याकडून माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल.
– पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग