Maharashtra Summer Update : राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण आता निवळले आहे. त्यामुळे आता उन्हाचा चटका वाढला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा ३७ च्या पुढे गेला आहे. त्यामुळे चांगलाच उकाडा जाणवत आहे. त्यातच आता पुढील चार दिवस तापमान वाढणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
दरम्यान, सोमवारीही राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. विदर्भापासून मराठवाडा, कर्नाटक ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. दक्षिण ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यात दिवसा ढगाळ वातावरण अनुभवायला मिळणार आहे.
महाराष्ट्रात सध्या काही भागात उन्हाळा सुरू झाला असून वाढत्या उकाड्याने नागरिकांना आतापासूनच हैराण केले. मराठवाडा आणि पूर्व विदर्भात काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. आता हे अवकाळी पावसाचे सावट दूर झाले आहे. मात्र काही दिवस मराठवाडा आणि पूर्व विदर्भात अंशतः ढगाळ वातावरण असणार आहे असे हवामान खात्याने म्हटले आहे.
सोलापुरात उच्चांकी ३९.१ तापमान
शनिवारी किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या पार गेला आहे. सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूरमध्ये राज्यातील उच्चांकी ३९.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर विदर्भात कमाल तापमान ३७ अंशांच्या वरच आहे. कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.