– नीलकंठ मोहिते (प्रतिनिधी)
इंदापूर : मानवी जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वच्छता अतिशय महत्त्वाचे असून आपले गाव तालुका राज्य स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी आपल्या स्वतःचे घर व परिसर चकाचक ठेवण्याची भूमिका कुटुंबातील प्रत्येक नागरिकांनी मनापासून घ्यावी.
यातूनच आपले आरोग्य सुस्थितीत राहू शकते. स्वतःचे मन व परिसर स्वच्छ ठेवला तरच मानसिक समाधान लाभते अशी माहिती राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी दिली.
इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत अंथुर्णे येथे श्रमदानातून स्वच्छता मोहीम या शासनाच्या उपक्रमांतर्गत आमदार दत्तात्रय भरणे यांनी गावकऱ्यांसमवेत गाव स्वच्छ करण्यासाठी हातात झाडू घेतला. यावेळी गावातील नागरिक शेतकरी तसेच युवा वर्ग यांना आमदार भरणे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी गावातील नागरिक महिला मोठ्या संख्येने स्वच्छता अभियानात सहभागी झाल्या होत्या. पुढे माहिती देताना आमदार भरणे म्हणाले की, खऱ्या अर्थाने प्रत्येक गावागावांना समृद्धी देण्यासाठी स्वच्छतेची नितांत गरज आहे.
आपल्या घरातील सांडपाणी व घनकचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले तर चांगल्या आरोग्याचे गाव म्हणून नावलौकिक अंथुर्णे गावकरी मिळवतील.
राज्य शासन केंद्र शासनाचा हेतू अत्यंत स्वच्छतेच्या संदर्भात हितकारी असून, आपले घर गाव स्वच्छ सुंदर कायम ठेवूयात असा संकल्प प्रत्येकाने मनापासून घ्यावा अशी ही माहिती आमदार भरणे यांनी दिली.