वाई – प्रशासनाने हागणदारीमुक्त (ओडीएफ प्लस) शहराचा प्रस्ताव सादर करताना खोट्या सहीचे घोषणापत्र केल्याचा आरोप उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी आज पालिकेच्या विशेष सभेत केला. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. मात्र, कर्मचाऱ्यांवर काहीही आरोप करु नका. खोटी सही केल्याचे सिद्ध करा, असे आव्हान मुख्याधिकारी विद्या पोळ यांनी दिले. त्यावरून उपाध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्यात खडाजंगी होऊन मुख्याधिकाऱ्यांसह सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सभात्याग केला.
वाई विकास महाआघाडी व तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सदस्यांनी प्रशासनाच्या या कृतीचा जाहीर निषेध केला. नगराध्यक्ष व उपाध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा पाढा वाचला. या प्रकरणी जिल्हाधिकारी व नगरविकास विभागाकडे तक्रार करण्यात येणार आहे. नगराध्यक्ष डॉ. प्रतिभा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पालिकेची विशेष सभा झाली.
विषयपत्रिकेवरील स्वच्छ सर्वेक्षण 2020 मधील सहभाग, फाइव्ह स्टार मानांकन प्रस्ताव सादर करणे, जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापन करणे, 14 व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून घंटागाड्यांद्वारे ओला व सुका कचरा, प्लॅस्टिक कचरा वर्गीकरण व संकलित करून वाहतूक करणे व योग्य विल्हेवाट लावण्याच्या कामास प्रशासकीय मान्यता घेणे, ह विषय चर्चेला होते. प्रारंभी आ. मकरंद पाटील व खा. श्रीनिवास पाटील यांच्या अभिनंदनाचा आणि नगरसेवक विकास काटेकर, मुकादम दिलीप पवार व अपघाती निधन झालेले प्रसाद सुतार यांच्या दुखवट्याचा ठराव झाला.
त्यानंतर विषयपत्रिकेचे वाचन सुरु झाले. सावंत यांनी हागणदारीमुक्त शहराच्या प्रस्तावाचा मुद्दा उपस्थित केला. हा प्रस्ताव सादर करताना सभागृहाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. ओडीएफ प्लस प्रस्तावासोबत प्रशासनाने जोडलेल्या घोषणापत्रावर मी सही केली नाही. कोणी तरी माझी खोटी सही केली असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी सावंत यांनी केली. त्यावर, सर्व पदाधिकाऱ्यांना मी व्यक्तिश: फोन करून सही करण्याची विनंती केली होती. प्रत्येकाच्या घरी जाऊन कर्मचाऱ्यांनी सह्या आणल्याचा खुलासा पोळ यांनी केला. या सह्या खऱ्या की खोट्या, हे सिध्द करावे लागेल. सही गिरविण्यात आल्याचे स्पष्ट दिसते. शिक्कादेखील जुना वापरला असून कर्मचाऱ्यांची पाठराखण करू नका, असे उपाध्यक्षांनी सांगितले. त्यावर दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. त्यानंतर पोळ यांनी सभात्याग केला. त्यांच्यापाठोपाठ सर्व कर्मचारीही सभागृहातून निघून गेले.
त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. प्रतिभा शिंदे म्हणाल्या, मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांनी परवानगी न घेता सभात्याग केला. स्वच्छ सर्वेक्षणाचा प्रस्ताव सादर करण्याची उद्या शेवटची मुदत असल्याने यावर चर्चा होणे गरजेचे होते. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांना पुन्हा सभेत बोलविण्यात आले तरी त्या आल्या नाहीत. अनिल सावंत म्हणाले, प्रस्ताव सादर करताना प्रशासनाने सदस्यांना विश्वासात घेतले नाही. सभागृहातील ठरावाची अमंलबजावणी न करता ठेकेदाराला हाताशी घरून प्रशासनाने केवळ कागदोपत्री पुरावे सादर करून हागणदारीमुक्तीचे पारितोषिक मिळवले. शहरातील अनेक समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. केवळ फ्लेक्स लावून शहर स्वच्छ असल्याचा दिखावा केला जात आहे. मुख्याधिकारी पर्यटनाला आल्याप्रमाणे आठवड्यातून दोन दिवस कार्यालयात येतात. प्रशासनाने परस्पर घेतलेल्या अनेक निर्णयामुळे पालिकेचे नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी व नगरविकास संचालकांकडे तक्रार करण्यात येणार आहे.