सणबूर – लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. शिवाजीराव देसाई यांचे कार्य प्रेरणादायी आहे. मुंबई याठिकाणी एक प्रसिध्द उद्योजक म्हणून नावारुपाला आलेले स्व. शिवाजीराव देसाई हे आपल्या वडिलांच्या शब्दाखातर पाटण तालुक्यात आले आणि लोकनते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याची उभारणी करुन त्यांनी तालुक्याला प्रथमत: सहकाराची दिशा मिळवून दिली.
सहकाराबरोबर शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी चांगली कामगिरी केली. त्यांचा सहकाराचा आणि शैक्षणिक वारसा आम्ही लिलया पेलत आहोत. स्व. आबासाहेब यांचे अधुरे स्वप्न मतदार संघातील जनतेने पूर्ण करुन दाखविले. मतदारसंघातील जनतेने प्रामाणिकपणे आम्हास जे पाठबळ दिले आहे त्या पाठबळाच्या जीवावर आपली देसाई गटाची यशस्वी वाटचाल सुरु आहे याचा आनंद असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाई यांनी केले.
दौलतनगर ता. पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. शिवाजीराव देसाई यांच्या 76 व्या जयंती सोहळा कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई, कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, डॉ. दिलीपराव चव्हाण, व्हाईस चेअरमन राजाराम पाटील, शिवदौलत बॅंकेचे चेअरमन मिलिंद पाटील, डॉ. डी. पी. जाधव उपस्थित होते.
आमदार देसाई म्हणाले, मरळीच्या माळरानावर साखर कारखाना उभा करणे शक्य नव्हते. त्या काळात एक लाख टनही ऊस तालुक्यात उपलब्ध नव्हता. परंतु आदरणीय लोकनेते साहेबांच्या शब्दाखातर मरळीच्या माळरानावर साखर कारखाना उभारण्याची जबाबदारी स्व.आबासाहेब यांनी लिलया पार पाडली. पाटण तालुक्यात मरळीला सहकारी साखर कारखान्याची उभारणी झाली नसती तर आज पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांची आणि या विभागाची परिस्थिती काय असती याचाही सारासार विचार करणे गरजचे आहे.
कारखान्यासाठी भागभांडवल उभा करण्यात मोठ्या अडचणी असतानाही तालुकाभर फिरुन त्यांनी भागभांडवल गोळा केले आणि सहकारी तत्वावर साखर कारखान्याची उभारणी केली. अल्पावधीतच कारखाना कर्जमुक्त करुन तो शेतकऱ्यांच्या मालकीचा करुन दिला. स्व. आबासाहेबांनी केलेल्या या महत्त्वपूर्ण कार्याचे ऋण तालुक्यातील शेतकऱ्यांना कधीही न फेडता येणारे आहे. कारखान्याची उन्नती करणे हीच खऱ्या अर्थाने स्व. शिवाजीराव देसाई यांना श्रध्दांजली ठरणार आहे.
पाटण तालुक्यात सहकार क्षेत्रात स्व.शिवाजीराव देसाईसाहेबांनी केलेले कार्य या विभागाच्या इतिहासातील सोनेरी पर्व ठरले आहे. लोकनेते व स्व.आबासाहेब यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार आम्ही गेली 32 ते 33 वर्षे पाटण तालुक्यात काम करीत आहोत. हाच विचार आणि आदर्श घेवून आम्ही भविष्यातही कार्यरत राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. प्रास्ताविक अशोकराव पाटील यांनी केले. आभार पांडुरंग नलवडे यांनी मानले.