डोर्लेवाडी -बारामती नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या नीरा डावा कालव्याचे सुशोभिकरणाचे काम गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असल्याने तलावात पिण्याचे पाणी सोडण्यास विलंब होत असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
त्यामुळे बारामती तालुक्यातील चार गावांसाठी असलेला मेखळी- सोनगांव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा तलाव कोरडा पडला आहे. पिण्याचे पाणी मिळत नसल्याने “तलाव उशाला, कोरड घशाला’ अशी परिस्थिती चार गावांतील लोकांची झाली आहे. सुमारे 24 हजार नागरिकांवर पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे.
सध्या बारामती तालुक्यात करोनाचा कहर सुरू आहे. प्रशासनाकडून साबणाने वारंवार हात धुण्यास सांगितले जात आहे. मात्र, पाणी नाही तर वारंवार हात कोठून धुवायचे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. प्रदूषित पाणी पिण्यात आले तर रोगराईला आमंत्रण मिळणार आहे. त्यामुळे जोपर्यंत तलावात पाणी येत नाही. तोपर्यंत प्रशासनाने शुद्ध पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
नियमित वेळेत सुटणाऱ्या कालव्याचे पाणी सुटण्यास उशीर होत आहे. अजून 5 दिवस पाणी येणार नसल्याचे समजते. सध्या मेखळी- सोनगांव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील तलाव कोरडा पडला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा बंद आहे. ज्या नागरिकांकडे बोअर आहेत. त्यांनी शेजाऱ्यांना पाणी पुरवून सहकार्य करावे.
– शशिकांत शिंदे, सचिव, पाणीपुरवठा योजना