कुरेशी यांचे राजकीय पक्षांना समान भूमिका ठेवण्याचे साकडे
इस्लामाबाद -काश्मीर मुद्द्यावरून एकी दाखवण्याचा खटाटोप पाकिस्तानात सुरू आहे. त्यातून पाकिस्तानमधील सर्व राजकीय पक्षांनी समान भूमिका ठेवावी, असे आवाहन त्या देशाचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांनी केले आहे.
भारताने नुकतेच धडक पाऊल उचलून जम्मू-काश्मीरला प्रदान करण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा काढून घेतला. त्यामुळे काश्मीरवर वाकडी नजर असलेल्या पाकिस्तानची तंतरली आहे.
त्यातून पाकिस्तानकडून काश्मिरींविषयी खोटे प्रेम दाखवले जात आहे. त्याचेच प्रत्यंतर घडवत कुरेशी यांनी पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबादमध्ये ईद साजरी केली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानात ऐक्य असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण पाकिस्तानात आणि राजकीय नेतृत्वात काश्मीरबाबत एकोपा आहे.
काश्मिरींच्या पाठिंब्यासाठी 14 ऑगस्टला एकच आवाज ऐकू येईल, असे त्यांनी म्हटले. 14 ऑगस्टला पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन आहे. त्या दिवशी पाकिस्तानकडून काश्मीरला पाठिंबा दर्शवला जाणार आहे. तर भारताचा स्वातंत्र्यदिन (15 ऑगस्ट) पाकिस्तानात काळा दिवस म्हणून पाळला जाणार आहे.
काश्मीरबाबत पाकिस्तानमध्ये ऐक्य असल्याचे कुरेशी म्हणत असले तरी त्यांच्या वक्तव्यातूनच ते खोटे बोलत असल्याचेही उघड झाले. पाकिस्तानमधील राजकीय पक्षांनी काश्मीर मुद्द्यावर एकत्र यायला हवे. त्या मुद्द्यावरून राजकारण करणे हानीकारक ठरेल, असा इशारा त्यांनी दिला.
मागील आठवड्यात पाकिस्तानी संसदेत भारतविरोधी ठराव मंजूर करण्यात आला. त्यावेळी त्या देशातील सत्ताधारी आणि विरोधकांमधील मतभेद चव्हाट्यावर आले होते. त्यामुळे पाकिस्तान सरकारची मोठीच गोची झाली होती.