मुंबई (प्रतिनिधी) – पूर परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत राज्यातील पूरग्रस्त भागातील 4 लाख 66 हजार 963 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या नागरिकांसाठी 441 तात्पुरता निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. राष्ट्रीय व राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या 33 पथकांसह लष्कर, नौदल, तटरक्षक दलाची एकूण 111 बचाव पथके कार्यरत आहेत. या सर्व ठिकाणी वैद्यकीय सेवा कार्यरत असल्याची माहिती राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे.
पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे कोल्हापूर, सांगलीसह सातारा, ठाणे, नाशिक, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये 70 तालुके बाधीत झाले आहेत. यातील पूरग्रस्त गावांची संख्या 761 इतकी आहे. या सर्व ठिकाणी मदत कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यांमध्ये 105 बचाव पथके कार्यरत करण्यात आली आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 54 तर सांगली जिल्ह्यात 51 पथकांचा समावेश आहे. याशिवाय पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नागपूर येथेही बचाव पथके कार्यरत आहेत.
पूरग्रस्त कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील बारा बाधित तालुक्यातील 2 लाख 47 हजार 678 तर सांगली शहरासह जिल्ह्यातील चार बाधित तालुक्यातील 1 लाख 73 हजार 89 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 208 तर सांगली जिल्ह्यात 108 तात्पुरता निवारा केंद्र सुरु करण्यात आली आहेत.
पावसामुळे पूरस्थितीत असलेल्या राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये बचाव कार्य जोमाने सुरू आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 118 गावांमधील 9 हजार 521, ठाणे जिल्ह्यामधील सात तालुक्यातील 25 गावांमधील 13 हजार 104, पुणे जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 108 गावांमधील 13 हजार 500, नाशिक जिल्ह्यातील पाच तालुक्यातील 5 गावांमधील 3 हजार 894, पालघर जिल्ह्यातील तीन तालुक्यातील 58 गावांमधील 2 हजार, रत्नागिरी जिल्ह्यातील सात तालुक्यातील 12 गावांमधील 687, रायगड जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील 60 गावांमधील 3 हजार, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सात तालुक्यातील 18 गावांमधील 490 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.