माधव विद्वांस
विनोदी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मेहमूद अली यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म 29 सप्टेंबर 1932 रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे वडील मुमताज अली हे अभिनेते होते तसेच त्यांचा एक नृत्य समूह होता व ते भारतभर आपले कार्यक्रम करीत असत. त्या कार्यक्रमात मेहमूद व त्यांची बहीण मिनू लहानपणी भाग घेत असत. त्यामुळे अभिनयाचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले होते.
विनोदी अभिनेते म्हणून हिंदी चित्रपटांमध्ये केलेल्या अप्रतिम अभिनयाबद्दल त्यांना 25 वेळा नामांकन प्राप्त झाले होते व सुमारे 19 वेळा विनोदी अभिनेता म्हणून फिल्मफेअर ऍवार्ड मिळाले होते. तसेच त्यांनी सुमारे 300 चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. ते 11 वर्षांचे असताना बॉम्बे टॉकीजच्या “किस्मत’ या चित्रपटामध्ये शेखर या बालकलाकाराची (अशोककुमार यांच्या लहानपणाची) भूमिका करून पदार्पण केले होते.
अभिनेता म्हणून काम करण्यापूर्वी त्यांनी अनेक छोटी मोठी कामे केली होती. अगदी वाहनचालक म्हणूनही त्यांनी काम केले होते. अभिनेत्री मीनाकुमारी यांना ते टेबलटेनिस शिकवण्यासाठी जात होते. तेथे मीनाकुमारीची बहीण मधू यांच्याशी त्यांची ओळख झाली. पुढे त्यांनी मधू यांच्याशी लग्न केले. लग्न करून प्रापंचिक जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांनी अभिनय क्षेत्रात काम करायचे ठरविले.
त्यानंतर 10 वर्षांनी (वर्ष 1953) सुरुवातीला त्यांनी “दो बिघा जमीन’ आणि “प्यासा’ या दोन चित्रपटांत किरकोळ पात्रे साकारली. वर्ष 1958 मध्ये “परवरीश’ या चित्रपटात मेहमूद यांना पहिला मोठा ब्रेक मिळाला. यात त्यांनी चित्रपटाचा नायक राज कपूरच्या भावाची भूमिका केली होती.
महमूद यांच्या कुटुंबात हैद्राबादी भाषेचा प्रभाव असल्याने त्यांच्या बोलण्यातील हैदराबादी ढब प्रेक्षकांना खूपच भावला. त्यांनी “गुमनाम’ या चित्रपटात दक्षिण भारतीय स्वयंपाक्याचे पात्र साकारले. त्यानंतर त्यांनी “प्यार किये जा’, “प्यार ही प्यार’, “ससुराल’, “लव्ह इन टोकियो’ आणि “जिद्दी’ या चित्रपटांत विनोदी अभिनेत्याची भूमिका साकारली.
नंतर त्यांनी काही चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकादेखील केली; पण प्रेक्षकांनी त्यांना विनोदी अभिनेता म्हणूनच जास्त स्वीकारले. वर्ष 1968 मध्ये त्यांनी एन. सी. सिप्पी यांच्याबरोबर “पडोसन’ या चित्रपटाची निर्मिती केली. यामध्ये सुनील दत्त, सायराबानो, किशोरकुमार, मेहमूद यांच्या भूमिका होत्या तसेच आर. डी. बर्मन यांचे संगीत होते. त्यातील “एक चतुर नार’ हे गाणे किशोरकुमार व मेहमूद यांच्यावर चित्रीत झाले होते. हे गाणेही लोकप्रिय झाले होते.
वर्ष 1972 मध्ये एन. सी. सिप्पी यांच्याबरोबर त्यांनी “बॉम्बे टु गोवा’ या चित्रपटाची निर्मिती केली. यामध्ये अभिताभ बच्चन यांना पहिल्यांदाच नायकाची भूमिका मिळाली. या चित्रपटामध्ये मेहमूद यांच्यासह अरुणा इराणी, शत्रुघ्न सिन्हा, नासिर हुसेन, केस्टो मुखर्जी यांच्याही भूमिका होत्या. यामध्ये मेहमूद यांनी कंडक्टरची भूमिका साकारली होती. वर्ष 1996 मधील “दुश्मन दुनिया का’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट. 23 जुलै 2004 रोजी अमेरिकेच्या पेनसिल्वेनिया शहरात त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.