विठ्ठल वळसे पाटील
विकासाच्या नावाखाली निसर्गाच्या सौंदर्याला नख लावले गेले. वन व वन्यजीव संवर्धनाऐवजी मानवाने त्यांच्या अस्तित्वावरच घाला घातला आहे. आज वनसंवर्धन दिन त्या निमित्ताने…
भारत हा उष्ण कटिबंधीय प्रदेशात असून आपल्याकडे तीनही ऋतूंचे वैशिष्ट्ये महत्त्वपूर्ण आहे. स्वातंत्र्यप्राप्तीआधी भारतातील निसर्ग विविधतेने नटलेला होता. समाधानकारक पर्जन्यमान होते. जैवविविधता मुबलक प्रमाणात होती. पक्षी, प्राणी, वनस्पती यामुळे निसर्ग समृद्ध होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर औद्योगिकीकरण, रस्ते बांधणी, धरणक्षेत्र, शहरांचा अक्राळविक्राळ विस्तार, टेकड्यांची तोडफोड, जंगलाचा नाश यामुळे जैवविविधतेचा ऱ्हास होत गेला.
जैवविविधतेला पोषक असे हवामान असल्याने पक्षी, सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी, मासे, अपृष्ठवंशी प्राणी, सपुष्प व अपुष्प वनस्पती यांचा भारतात खजिना आहे. म्हणून भारताचा जागतिक जैवविविधता प्राप्त देशात समावेश होतो. आता जैवविविधता विकासाच्या भक्ष्यस्थानी पडली आहे.
अनेक प्रजाती नष्ट झाल्या आहेत. ही पर्यावरणाच्या दृष्टीने मोठी शोकांतिका आहे. जैवविविधतेतील अनेक जाती, प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने अनेकांना संरक्षण देण्यात आले आहे. यासाठी अभयारण्यांची उभारणी करण्यात आली आहे. हिमालय पर्वतरांगा, सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये आजही जैवविविधता जिवंत असल्याचे दिसते.
भारतात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होते. त्याचबरोबर वणवा लागल्यामुळेही जंगलांचे मोठे नुकसान होते. अमेरिकेत दरवर्षी वणवा लागल्याने अनेक वृक्षराजी नष्ट होतात. मागील वर्षी ऍमेझॉन खोऱ्यातही भीषण आग लागली होती. कित्येक दिवस आगीचे तांडव सुरूच होते. या आगीत असंख्य वनस्पती, प्राणी, वनसंपत्ती जळून राख झाली.
ऑस्ट्रेलियालाही अशा वणव्यांचा सामना करावा लागतो. अशाप्रकारे जंगलाला निसर्गनिर्मित धोका असताना मानवनिर्मित धोक्याचीही त्यात भर पडते. भारतात प्राण्यांची शिकार करण्यास कायद्याने बंदी असल्यावरही अनेक प्राण्यांची तस्करी करण्यासाठी शिकार केली जाते. हस्तीदंतासाठी हत्तीची शिकार केली जाते. खवल्या मांजराचीही मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. तर रस्त्यावरील अपघातात अनेक वन्यप्राणी बळी पडतात.
चित्ता हा प्राणी भारतातून 1965 साली नामशेष झाला आहे. अशाच प्रकारे गरूड, गिधाड, घार नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ससाणा, घुबड, माळढोक, वटवाघूळ, मैना, पोपट, सुतार पक्षी, बदक, बगळे, करकोचे, खंड्या, रोहित (फ्लेमिंगो) आदी पक्षी संकटग्रस्त आहेत. 2018 सालात वाघ (102), हत्ती (57) आणि बिबट्या (473) मृत्यू झाल्याची नोंद आहे.
“वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्व्हेत 2019 या वर्षात देशात 110 वाघांचा मृत्यू झाल्याचे आढळले आहे. यात मध्य प्रदेश प्रथम तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. यात 34 वाघांची शिकार झाली आहे. तर याच वर्षात 491 बिबट्या मृत्यू पडल्याचे आढळले आहेत. शिकार, अपघात आदी कारणामुळे मृत्यू झाला आहे. 2012 ते 2019 मध्ये 750 वाघ भारताने गमावले आहेत. सध्या उपलब्ध आकडेवारीत 2 हजार 967 वाघ आहेत. भारतात वाघांचे प्रमाण जास्त आहे. त्यात वाढही होत आहे.
वन व वन्यजीव रक्षण करण्याची वेळ आली आहे. डोंगरमाथ्यावरून जाणारे रस्ते, प्रकल्प अशा विकास योजनांमुळे 120 वनौषधी वनस्पती संकटग्रस्त आहेत. जंगलावरील मानवी अतिक्रमणाचा विळखा घातकच ठरणार आहे.
मानवी हस्तक्षेपामुळे जंगलातील अन्न साखळी तुटल्याने लोकवस्तीमध्ये हिंस्त्र प्राण्यांचे आक्रमण झाल्याचे दिसते. सह्याद्रीच्या डोंगररांगांत आजही जैवविविधता टिकून असली तरी याचे प्रमाण कमी झाले आहे. गवा, वाघ, बिबट्या, हरीण, सांबर, अस्वल, रानडुक्कर, उदमांजर, ससा, शेकरू खार, रानकुत्रा नजरेस पडतात.
यातील बिबट्या, लांडगे, कोल्हे अन्न शोधण्यासाठी मानवी वस्तीवर अतिक्रमण करून शेतकऱ्यांच्या पशुधनाची शिकार करत आहे. त्यांचे अन्न जंगलात मिळाले पाहिजे यासाठी देशी वृक्ष, पाणवठे, पक्ष्यांसाठी अन्न, शाकाहारी प्राण्यांसाठी मुबलक गवत उपलब्ध झाले तर “जीव जीवश्य जीवनम्’ या कालचक्राप्रमाणे जंगले समृद्ध होतील.
जंगले सपाट करून गृहप्रकल्प, कारखानदारी उभी राहिल्याने हवेच्या प्रदूषणामुळे पशू, पक्षी मूळचा आदिवास सोडून स्थलांतरित झाले. गुलमोहर, निलगिरी, लिरीसीडीया, सुरू, सायफस, सुबाभळ, ऑस्ट्रेलियन बाभळ अशी विदेशी झाडे दिसू लागली आहेत. बहुपयोगी व वनौषधी देशी वृक्षांची लागवड न झाल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत गेला.
वड, पिंपळ, लिंब, चिंच, आंबा, कवठ, बेल, नांदूर, करंज, आपटा, साग, साल, लाख, बाभूळ या वृक्षांची लागवड करणे काळाची गरज आहे. कारण या वृक्षांचा पाला, शेंगा, फळे, साल व लाकूड किफायतशीर असते. जनावरांचा चारा व पक्ष्यांचं आश्रयस्थान असते.
देशी वृक्षांची फळे, पाला, शेंगा, साल खाल्ल्याने माकड, जनावरांस व मानवास कोणताही दुष्परिणाम होत नाही. येणाऱ्या काळात पक्ष्यांचा थवा, किलबिलाट, हरणाचे बागडणे, जंगलाबाहेर न पडणारे हिंस्त्र पशू पाहावयाचे असेल तर निसर्गाचे सौंदर्य टिकवण्याची सामूहिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे.