तरीही नवे पॅकेज देण्याबाबत विचारविनिमय सुरू
नवी दिल्ली – केंद्र सरकारने आर्थिक पॅकेजबरोबरच इतर अनेक उपाययोजना केल्यामुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा होत आहे. मात्र, तरीही सरकारचे परिस्थितीकडे बारीक लक्ष असून आगामी काळात आणखी पॅकेज जाहीर करण्यात येईल, असे संकेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहेत.
उद्योगक्षेत्रासाठी नव्या कल्पनावर आयोजित करण्यात आलेल्या इंडिया आयडिया शिखर बैठकीत बोलताना सीतारामन म्हणाल्या की, तब्बल 21 लाख कोटींच्या पॅकेजमुळे छोट्या उद्योगांसह सर्व उद्योगांना आधार मिळाला आहे. विविध क्षेत्रातून उपलब्ध होत असलेल्या आकडेवारीनुसार संबंधित क्षेत्राची उत्पादकता वाढवू लागली आहे. तरीही सरकार विविध उद्योगांच्या संपर्कात असून त्यांच्या अडचणी विचारात घेण्यात येत आहेत. त्या आधारावर आगामी काळात आवश्यक ती मदत देण्यात येईल, असे सीतारामन म्हणाल्या.
आत्मनिर्भर भारत योजनेबाबत त्या म्हणाल्या की, याचा अर्थ आपण स्वतःला कोंडून घेणार आहोत असा नाही. भारताने आयात कमी करून निर्यात वाढविण्यासाठी हे धोरण जाहीर केले आहे. भारतातील वस्तू केवळ देशातील जनतेसाठी नाही तर परदेशातील जनतेसाठी आकर्षक वाटाव्या, असा या धोरणाचा उद्देश आहे. सरकार ज्या क्षेत्रात कार्यरत आहे त्या क्षेत्रामध्ये खासगी क्षेत्राला परवानगी देण्याचे धोरण सध्या राबविण्यात येत आहे. त्यामुळे सरकारी क्षेत्रांना स्पर्धा निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, सरकार फक्त नवे पॅकेज जाहीर केले जाणार असल्याचे सांगत आहे. मात्र, ते जाहीर केले जात नसल्याबद्दल उद्योगात चिंता व्यक्त केली जात आहे.
कोणत्या क्षेत्रात उत्पादकता वाढली
विजेचा वापर वाढला आहे, डिझेल आणि पेट्रोलचा वापर वाढू लागला आहे, असे सांगून सीतारामन म्हणाल्या की, आंतरराज्य वाहतुकीतही वाढ झाली आहे. त्याचबरोबर सेवा क्षेत्र आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचे पीएमआय निर्देशांक वाढले आहेत. बॅंकेतून कर्जासाठी मागणी वाढू लागली आहे, असे सीतारामन यांनी सांगितले. कृषी क्षेत्राची उत्पादकता या वर्षी चांगला पाऊस पडल्यामुळे वाढणार असल्याचे सीतारामन म्हणाल्या.