नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असणारा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांतील लेफ्टनंट जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांची बैठक उद्या होणार आहे. अशी बैठक ही नेहमी आपत्कालीन स्थितीत आयोजित केली जाते.
काही प्रलंबित मुद्द्यांच्या सोडवणुकीसाठी अशा आणखी काही चर्चेच्या फेऱ्या व्हाव्या लागतील, असे विश्लेषकांचे मत आहे. डोकलाम येथे 2017 मध्ये झालेल्या तणावाच्या स्थितीनंतर सध्या पूर्व लडाखचा मुद्दा तणावाचे कारण बनला आहे.
भारतीय सीमेजवळ सुरू असलेल्या पूल आणि रस्त्याच्या कामाला चीनने आक्षेप घेतला आहे. चीन त्यांच्या बाजूला सीमेजवळ नेहमी विकास कामे करत असते. मात्र भारताने आपल्या हद्दीत कोणतेही काम सुरू केल्यास त्यास आक्षेप घेतला जातो. भारत सध्या आहे तीच स्थिती ठेवण्याच्या प्रयत्नात आहे, तर चीन मात्र त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. भारत आणि चीनमध्ये सुमारे चार हजार किमीची सीमा आहे.
एक महिन्यापेक्षा अधिक काळ दोन्ही देशातील लष्कर आमने सामने टाकले आहे. लडाखमध्ये मे महिन्याच्या सुरवातीला पॅनगॉंग तलावाजवळ दोन्ही सैन्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. दोन्ही देशातील लष्करी अधिकाऱ्यांतील बैठक हे हा तणाव कमी करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल असल्याचे मानण्यात येत आहे.