नुकतीच बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी होऊन गेली. तेव्हा मला भूतकाळात झालेल्या त्यांच्या एकमेव भेटीची आठवण झाली. ते बहुधा 1968 किंवा 1969 हे वर्ष असेल. मी तेव्हा बडोद्यातल्या महाराजा सयाजीराव विद्यापीठातील कलाभवन इथं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होतो. माझी आणि डॉ. दामोदर विष्णू नेने ऊर्फ दादूमिया यांच्याशी मैत्री जुळली होती. डॉक्टरसाहेब बडोद्यात वैद्यकीय व्यवसाय-म्हणजे एक दवाखाना आणि एक रुग्णालय-सांभाळून लेखन करीत. त्यांचे सोबत साप्ताहिकातले लेख खूप गाजले होते. मीही त्यावेळी लेखनास सुरुवात केली होती आणि माझे लेख आणि माझ्या कथा वाङ्मयशोभा, नवल अशा दर्जेदार मासिकांतून प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या. त्यामुळे लेखन हा आमच्या मैत्रीमधला एक मोठा दुवा होता. डॉक्टरसाहेबांच्या दवाखान्यात आमच्या चर्चा रंगत. डॉक्टरसाहेब नुसतेच एक लेखक नव्हते तर एक विचारवंतही होते. आमच्या चर्चांना या कारणानं एक वेगळीच लज्जत येत असे.
माझं मूळ निवासस्थान पुण्यात असल्यानं मी सुट्टीला पुण्यात येत होतो. वर्षातून बडोदा-पुणे असा 3-4 वेळा तरी प्रवास घडत असे. एकदा डॉक्टरांनी मला विचारलं, तुम्ही पुण्याला जाताच आहात तर माझं मुंबईला एक छोटंसं काम कराल का? मी आनंदानं होकार दिला. मला फक्त मुंबईला एक ब्रेक घ्यावा लागणार होता आणि मुंबईत माझी बऱ्यापैकी मित्रमंडळी राहात असल्यानं काहीच प्रश्न नव्हता. डॉक्टरसाहेबांची कामं तर खासच होती. डॉक्टरसाहेब मला त्यांचा खास दूत असं संबोधत! अशा पद्धतीनं मी त्यांची कित्येक कामं तडीस नेली. त्यांची कामं म्हणजे त्यांचे महत्त्वाचे निरोप, काही पुस्तकं, कागदपत्रं आणि वेळप्रसंगी काही ध्वनिफिती महत्त्वाच्या व्यक्तींकडे पोचवणे अशी होती. डॉक्टरसाहेबांचा माझ्यावर नितांत विश्वास होता आणि मलाही काही मोठ्या व्यक्तींची भेट होणार असल्याचं आकर्षण होतं.
एका बडोदा-मुंबई-पुणे प्रवासात मुंबईला थांबून बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन एक पुडकं त्यांच्या हातात देण्याची कामगिरी माझ्याकडे आली. मी मुंबईत थांबून एका मित्राकडे अंबरनाथला उतरलो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून लोकल पकडली आणि दादरला आलो. त्या काळी बाळासाहेब ठाकरे यांच्या सुप्रसिद्ध मार्मिक साप्ताहिकाचं कार्यालय दादरच्या रानडे रोडवर होतं. मला वाटतं त्या काळी ते तिथंच राहतही होते. कार्यालय सापडायला अजिबात अवघड गेलं नाही. कार्यालय एका कोपऱ्यावर पहिल्या मजल्यावर होतं.
तिथं बऱ्यापैकी गर्दी होती. तिथल्या काही लोकांनी काय काम आहे? असं विचारलं. मी बडोद्याहून आलो असून एक महत्त्वाची वस्तू बाळासाहेबांच्याच हातात द्यायची आहे असं सांगितल्यावर मला त्वरित बाळासाहेबांच्या दालनात पाठवण्यात आलं. त्या दालनात एका भिंतीला लागून मधोमध एक अक्षरश: सिंहासनवजा आसन होतं. बाळासाहेब त्यावर विराजमान झाले होते. ते भव्य आसन लाल रंगाच्या चामड्यापासून बनवल्याचं दिसत होतं. त्याच्या एका कडेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ठाणे शाखेकडून असा काहीसा मजकूर लिहिला होता.
कुणीतरी बाळासाहेबांच्या कानात माझ्या कामासंबंधी सांगितलं. बाळासाहेबांनी माझ्याकडे वळून मला जवळ यायला सांगितलं. मी जवळ गेलो. माझी आणि दादूमियांची मैत्री असल्याचं सांगितल्यावर त्यांचा चेहरा उजळला पण त्यांच्या मनात एक कुतूहल जागृत झालेलं दिसलं. माझ्यासारखा पोरसवदा तरुण दादूमियांचा मित्र कसा काय असा प्रश्न त्यांच्या मनात आलेला असावा. मग त्यांनी विचारलं, काय करता? मी बडोद्यातील शिक्षणाबद्दल सांगितल्यावर त्यांनी दादूमियांच्या ओळखीबद्दल विचारलं. तेव्हा मीही लेखन करतो असं कळल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं, वा, वा. छान. काय लिहिता? असं त्यांनी विचारलं. मी लेख, कथा आणि कविता असं लेखन करतो असं सांगितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा स्मित फुललं.
राजकीय लेख लिहिता की नाही असं त्यांनी साहजिकपणे विचारलं. त्यावर मी थोडंफार राजकीय विषयावरही लिहिलंय असं सांगितलं. त्यावर त्यांनी खांद्यावर हात ठेवला आणि म्हटलं, छान, छान. लिहीत राहा. त्यांचा असा आशीर्वाद मिळाल्यावर मलाही खूप बरं वाटलं. पुडकं त्यांच्या स्वाधीन करून मी त्यांना नमस्कार केला आणि तिथून बाहेर पडलो. मोठ्या लोकांची अशी अवचित आणि अनपेक्षित भेट झाली की आनंद तर होतोच पण त्यांचे आशीर्वाद मिळाल्यावर तो द्विगुणित होतो आणि प्रोत्साहनही मिळतं.
श्रीनिवास शारंगपाणी