सातारा -कास पठारावर पुष्प हंगाम सुरू झाला असून या पठारावर रिमझिमत्या पावसात पर्यटकांची वर्दळ सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी कास पठाराला बुधवारी भेट देऊन तेथील पुष्पसंपदेचे निरीक्षण केले. येथील औषधी वनस्पतींचा वापर लोककल्याणासाठी व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
नाईक यांनी कास पुष्प पठार परिसरातील जैवविविधतेची तसेच वेगवेगळ्या फुलांची माहिती त्यांनी जाणून घेतली. युनेस्कोने पठार परिसराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्याने या प्रजातींना वेगळे वैभव लाभल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. कास पठार आणि त्याची पुष्पसंपदा जपण्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. येथील प्रदूषण टाळण्याकरता पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या माध्यमातून पठारावर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी ई बस सेवा सुरू करण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. या ई बसची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर श्रीपाद नाईक यांनी कास पठाराला भेट दिली. यावेळी कास कार्यकारी समितीचे सर्व पदाधिकारी तसेच जावळी तालुक्याचे वनक्षेत्रपाल रंजनसिंह परदेशी तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे नानासाहेब लडकत, उत्तम सावंत इत्यादी उपस्थित होते. या पठाराच्या पुष्प वैभवाची नाईक यांनी सखोल माहिती घेतली. येथे आढळणाऱ्या औषधी वनस्पतीची त्यांनी माहिती घेत या औषधी वनस्पतींचा वापर दुर्धर रोगावरील उपचारासाठी व लोककल्याणाकरता व्हावा, असे मत त्यांनी नोंदविले.
कासच्या वैभवाची जपणूक करा
युनेस्कोने या पठाराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्यामुळे येथील पुष्प विभागाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. या वैभवाची जपणूक वेगवेगळ्या माध्यमातून आवर्जून केली जावी, अशी अपेक्षा श्री. नाईक यांनी व्यक्त केली. तसेच कास पठार कार्यकारी समितीचे काम अत्यंत उत्तम प्रकारे चालले आहे, अशा शब्दांत नाईक यांनी त्यांचे कौतुक करत आगामी कामासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.